Join us  

India vs England, 3rd Test : इंग्लंडला येताय, मग इगो खिशात असायलाच हवा; विराट कोहलीनं फुंकले रणशिंग

Virat Kohli in pre-match press conference इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातला तिसरा कसोटी सामना बुधवारपासून सुरू होत आहे. दोन सामन्यांनंतर मालिकेत १-० अशी आघाडी घेणारी टीम इंडिया हेडिंग्ले कसोटीतही पाहुण्यांना पाणी पाजण्यासाठी सज्ज आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 6:12 PM

Open in App

India vs England, 3rd Test : इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातला तिसरा कसोटी सामना बुधवारपासून सुरू होत आहे. दोन सामन्यांनंतर मालिकेत १-० अशी आघाडी घेणारी टीम इंडिया हेडिंग्ले कसोटीतही पाहुण्यांना पाणी पाजण्यासाठी सज्ज आहे. लॉर्ड्स कसोटीत दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये शाब्दिक कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळाला, त्यामुळे सामन्यातील वातावरणही अचानक तापले होते. तिसऱ्या कसोटीतही 'आरे ला कारे' करण्यासाठी टीम इंडिया तयार आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्या आजच्या पत्रकार परिषदेतील वक्तव्यावरून तरी तसे संकेत मिळत आहेत. 'इंग्लंडला येता, तेव्हा इगो खिशात घेऊनच यायला हवा,'असं विधान करून विराटनं इंग्लंडला खुलं आव्हान दिलं आहे.

गोल्डन ओव्हर ज्यात धावा होतील दुप्पट; पाच असे नियम जे आणखी वाढवू शकतील ट्वेंटी-२०चा थरार!

लॉर्ड्स कसोटीत जेम्स अँडरसनसोबत टीम इंडियाचा गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि विराट यांच्यात शाब्दिक वाद झाला होता. त्यावर आज विराटला विचारले असता तो म्हणला,''नेमके कोणते शब्द वापरले हे मी सांगू शकत नाही. ते स्टम्प माईकमध्ये रेकॉर्ड झालेच असतील. मैदानावर जे घडतं ते तिथेच राहतं. स्पर्धात्मक खेळात असे घडतेच. हा नवा सामना आहे आणि नवीन सुरुवात आहे.''  हेडिंग्ले कसोटीबाबत विराट म्हणाला, आम्ही इथे कसोटी क्रिकेट खेळलेलो नाही. संघातील प्रत्येक खेळाडू इथे प्रथमच कसोटी खेळणार आहे. ही आमच्यासाठी कसोटी मॅच आहे आणि एक संघ म्हणून जे करायला हवं, तेच आम्हाला करायचे आहे. त्यामुळे मागे काय घडलं, याचा अधिक विचार आम्ही करत नाही. 

आर अश्विन खेळणार की नाही?हेडिंग्लेची खेळपट्टीपाहून मला आश्चर्याचा धक्का बसला. खेळपट्टीवर कमी गवत आहे आणि आम्हाला अधिक गवताची अपेक्षा होती. काहीही घडू शकतं, पाहूयात. संघातील एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याशिवाय विजयी संघात बदल करण्याची गरज वाटत नाही. घट्ट बसलेली घडी मोडायची नाहीए. विशेषतः दुसऱ्या कसोटीतील विजयानंतर तर मुळीच नाही, असे विराटनं सांगितले. 

''परदेशात खेळताना सलामीची जोडी ही अत्यंत महत्त्वाची बाब असते. रोहित व लोकेश यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. नॉटिंग्हॅम कसोटीनंतर आम्ही निराश होतो. त्या सामन्यातील निकाल आमच्या बाजूनं लागेल, हा विश्वास आम्हाला होता. पण, त्याच विश्वासानं आम्ही लॉर्ड्सच्या मैदानावर उतरलो. हा संघ मागे हटणारा नाही, हे आम्ही दाखवून दिले. तरीही प्रतिस्पर्धींना आम्हाला कमी लेखायचे नाही,''असेही त्यानं स्पष्ट केले.

विराट कोहली पुढे म्हणाला,'' जेव्हा तुम्ही इंग्लंडला येता तेव्हा इगो खिशात घालूनच यायला हवा( Jab aap England aate ho toh, ego ko jeb mein rakhkar ana chahiye)'' 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडविराट कोहलीआर अश्विन
Open in App