लॉर्ड्स - इंग्लंडविरूद्धच्या दुस-या कसोटीत भारताचा पराभव अटळ मानला जात आहे. पाऊसच भारताचा मानहानिकारक पराभव टाळू शकतो.  इंग्लंडच्या पहिल्या डावातील 289 धावांची आघाडी भरून काढताना भारताच्या दुस-या डावात 50 धावांवर चार विकेट गेल्या आहेत. मुरली विजय, लोकेश राहुल, अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांनी अपयशाचा पाढा पुन्हा गिरवल्याने सर्व जबाबदारी कर्णधार विराट कोहलीच्या खांद्यावर आली आहे. 
सलामीवीर मुरली विजय भोपळा न फोडता माघारी परतला. त्याला बाद करून जेम्स अँडरसनने लॉर्ड्सवरील विकेटचे शतक पूर्ण केले. त्यापाठोपाठ राहुल (10) हाही अँडरसनचा शिकार बनला. पुजारा व रहाणे खेळपट्टीवर अधिक काळ टिकून राहिले, परंतु त्याचे रूपांतर त्यांना धावांमध्ये करता आले नाही. पुजारा ( 17) आणि रहाणे (13) यांना स्टुअर्ट ब्रॉडने माघारी धाडले. पाठीच्या दुखण्यामुळे कोहली पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला.
(India vs England 2nd Test: दोन्ही डावांत भोपळा फोडू न शकलेला मुरली सहावा फलंदाज)
(India vs England 2nd Test: जेम्स अँडरसन; लॉर्ड्सवरील शतकवीर!)
इंग्लंडने दुस-या कसोटीत पहिल्या डावात 289 धावांची आघाडी घेतली आहे. भारताच्या पहिल्या डावातील 107 धावांच्या प्रत्युत्तरात यजमानांनी 7 बाद 396 धावांवर डाव घोषित केला. सॅम कुरनला ( 40) हार्दिक पांड्याने बाद करताचा इंग्लंडचा कर्णधार जो रूटने डाव घोषित केला. ख्रिस वोक्स 137 धावांवर नाबाद राहिला.