Arshdeep Singh Becomes Highest Wicket Taker For India In T20Is : भारत- इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्सच्या मैदानात खेळवण्यात येतोय. भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय टी-२० क्रिकेटमधील उगवता तारा अर्शदिप सिंग याने आपल्या कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दोघांना तंबूचा रस्ता दाखवत मोजला चहलचा विक्रम
अर्शदीप सिंगनं पहिल्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर सॉल्टला शून्यावर माघारी धाडले. एवढेच नाही तर दुसऱ्या षटकातही त्याने इंग्लंडला धक्का दिला. या विकेटसह त्याने युजवेंद्र चहलचा विक्रम मोडीत काढला आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड्स अर्शदिप सिंगच्या नावे झाला आहे.
पहिल्या ओव्हरमध्ये चहलची बरोबरी, दुसऱ्या ओव्हरमध्ये नंबर वनचा ताज
ईडन गार्डन्सच्या मैदानात रंगलेल्या इंग्लंड विरुद्धच्या सामन्यातील पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर अर्शदीप सिंग याने इंग्लंडला फिल सॉल्टच्या रुपात पहिला धक्का दिला. इंग्लंडच्या या स्फोटक फलंदाजाला त्याने खातेही उघडू दिले नाही. या विकेटसह त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट्स मिळवणाऱ्या फिरकीपटू युजवेंद्र चहलची बरोबरी केली युजवेंद्र चहलच्या खात्यात ९६ विकेट्स जमा आहेत. अर्शदीपनं आपल्या दुसऱ्या षटकात सलामीवीर बेन डकेट याला माघारी धाडले अन् तो आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. युजवेंद्र चहलपेक्षा कमी सामन्यात त्याने हा पल्ला गाठला आहे.
आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
- अर्शदीप सिंग - ६१ सामन्यांमध्ये ९७* बळी
- युजवेंद्र चहल - ८० सामन्यांमध्ये ९६ बळी
- भुवनेश्वर कुमार - ८७ सामन्यांमध्ये ९० बळी
- जसप्रीत बुमराह - ७० सामन्यांमध्ये ८९ बळी