Join us  

India vs Bangladesh, 1st Test: मयांकची विक्रमांची आतषबाजी; टीम इंडियाकडे मजबूत आघाडी

मयांकनं दुसरे वैयक्तित द्विशतक झळकावताना भारताला भक्कम आघाडी मिळवून दिली. या सामन्यात मयांकनं अनेक विक्रमांना गवसणी घातली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 5:03 PM

Open in App

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारताची सुरुवात साजेशी झाली नाही. चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली झटपट माघारी परतले. मात्र, मयांक अग्रवाल आणि अजिंक्य रहाणे यांनी चौथ्या विकेटसाठी 190 धावांची भागीदारी करताना संघाला मजबूत आघाडीच्या दिशेनं वाटचाल करून दिली. मयांकनं दुसरे वैयक्तित द्विशतक झळकावताना भारताला भक्कम आघाडी मिळवून दिली. या सामन्यात मयांकनं अनेक विक्रमांना गवसणी घातली.

पहिल्या सत्रात बांगलादेशच्या अबू जावेदनं भारताला दोन धक्के दिले. त्यानं पुजाराला झेलबाद करून माघारी पाठवले. अबू जावेदनं कर्णधार कोहलीलाही पायचीत करून तंबूत पाठवले आणि तेही शून्यावर असताना. बांगलादेशविरुद्ध शून्यावर माघारी परतणारा तो दुसरा भारतीय कर्णधार ठरला. यापूर्वी सौरव गांगुली 2004 च्या वन डे सामन्यात शून्यावर बाद झाला.  त्यानंतर आलेल्या रहाणेनं झटपट खेळ केला.  या सामन्यांतून कसोटी क्रिकेटमधील 4000 धावांचा पल्ला ओलांडला. असा पल्ला पार करणारा तो 16वा भारतीय फलंदाज ठरला. 

उपहारानंतर मयांकने आपले शतक पूर्ण केले. त्यानं 197 चेंडूंत 15 चौकार व 1 षटकार खेचून 105 धावा केल्या. कसोटी क्रिकेटमधील त्याचे हे तिसरे शतक ठरले. पण, रहाणेला शतकानं हुलकावणी दिली. 172 चेंडूंत 9 चौकारांसह 86 धावा केल्या. रहाणेनं चौथ्या विकेटसाठी मयांकसह 190 धावांची भागीदारी केली. अजिंक्य माघारी परतल्यानंतर मयांकची फटकेबाजी सुरूच राहिली. मयांकनं मेहिदी हसनच्या गोलंदाजीवर षटकार खेचून द्विशतक पूर्ण केले. त्यानं 304 चेडूंत 25 चौकार व 5 षटकार खेचत द्विशतक पूर्ण केले.

मयांकने या खेळीसह सर डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम मोडला. कसोटीत सर्वात जलद दोन द्विशतकं झळकावणाऱ्या फलंदाजांत मयांकनं दुसरं स्थान पटकावलं. त्यानं 12 डावांत दोन द्विशतकं झळकावली. ब्रॅडमन यांना 13 डाव खेळावे लागले होते. या विक्रमात भारताचा विनोद कांबळी अव्वल आहे. त्यानं 5 डावांमध्ये दोन द्विशतकं पूर्ण केली होती. मयांक 330 चेंडूंत 28 चौकार व 8 षटकार खेचून 243 धावांवर माघारी परतला. त्यानंतर रवींद्र जडेजानं अर्धशतकी खेळी केली. टीम इंडियानं दुसऱ्या दिवसअखेर 6 बाद 493 धावा करताना 343 धावांची आघाडी घेतली आहे. अंधुक प्रकाशामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला.

 

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशमयांक अग्रवालरवींद्र जडेजाअजिंक्य रहाणे