Join us  

India vs Bangladesh, 1st Test: मयांक अग्रवालचे तिसरे शतक, विजय मर्चंट यांच्या अनोख्या विक्रमाशी बरोबरी

अजिंक्य रहाणे आणि मयांक अग्रवालनं भारताचा डाव सावरला. मयांकनं शतकी खेळी करून माजी सलामीवीर विजय मर्चंट यांच्या विक्रमाशी बरोबरी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 12:59 PM

Open in App

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटीचा पहिला दिवस भारतीय गोलंदाजांनी गाजवला. पण, दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारताची सुरुवात साजेशी झाली नाही. बांगलादेशच्या अबू जावेदनं भारताला दोन धक्के दिले. त्यानं चेतेश्वर पुजाराला झेलबाद करून माघारी पाठवले. पुजारानं 72 चेंडूंत 9 चौकार लगावत 54 धावा केल्या. त्याचे हे 24 वे अर्धशतक ठरले. त्यानंतर अबू जावेदनं कर्णधार विराट कोहलीलाही पायचीत करून तंबूत पाठवले आणि तेही शून्यावर असताना. मागील 11 डावांमध्ये कोहली तिसऱ्यांदा शून्यावर बाद झाला. त्यानंतर अजिंक्य रहाणे आणि मयांक अग्रवालनं भारताचा डाव सावरला. मयांकनं शतकी खेळी करून माजी सलामीवीर विजय मर्चंट यांच्या विक्रमाशी बरोबरी केली.

बांगलादेशविरुद्ध शून्यावर माघारी परतणारा तो दुसरा भारतीय कर्णधार ठरला. यापूर्वी सौरव गांगुली 2004 च्या वन डे सामन्यात शून्यावर बाद झाला. त्यानंतर 15 वर्षांनी भारतीय कर्णधारावर ही नामुष्की ओढावली. कसोटीत सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणाऱ्या भारतीय कर्णधारांत कोहलीनं माजी कसोटीपटू कपिल देव यांच्याशी बरोबरी केली आहे. या विक्रमात महेंद्रसिंग धोनी ( 8 वेळा) आणि मन्सूर अली खान पतौडी ( 7 वेळा) आघाडीवर आहेत. कपिल देव आणि कोहली प्रत्येकी 6 वेळा शून्यावर बाद झाले आहेत.  पुजारा आणि मयांक यांनी दुसऱ्या विकेटसाठी 91 धावा जोडल्या. 

त्यानंतर आलेल्या अजिंक्य रहाणेनं झटपट खेळ केला. मयांकनेही फटकेबाजी करताना तिसऱ्या विकेटसाठी रहाणेसोबत अर्धशतकी भागीदारी केली. पण, सामन्याच्या ब्रेकमध्ये रहाणेनं वैद्यकीय मदत बोलावली. रहाणेनं या सामन्यांतून कसोटी क्रिकेटमधील 4000 धावांचा पल्ला ओलांडला. असा पल्ला पार करणारा तो 16वा भारतीय फलंदाज ठरला.  उपहारानंतर मयांकने आपले शतक पूर्ण केले. त्यानं 197 चेंडूंत 15 चौकार व 1 षटकार खेचून 105 धावा केल्या. कसोटी क्रिकेटमधील त्याचे हे तिसरे शतक ठरले. त्याच्या या खेळीनं भारतानं दोनशे धावांचा पल्ला ओलांडला. या शतकासह मयांकने भारताचे माजी सलामीवीर विजय मर्चंट यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. भारताचा सलामीवीरानं तीन कसोटी शतकं झळकावण्यासाठी सर्वाधिक डाव खेळण्याच्या विक्रमात मयांक चौथ्या स्थानी आला. त्यानं 12 डावांमध्ये तीन शतकी खेळी केल्या. विजय मर्चंट यांनीही 12 डावांमध्ये तीन शतकं केली होती. या विक्रमात रोहित शर्मा ( 4 डाव), सुनील गावस्कर ( 7 डाव) आणि लोकेश राहुल ( 9 डाव) हे अव्वल तीन स्थानावर आहेत.

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशमयांक अग्रवालअजिंक्य रहाणेविराट कोहली