Join us  

India vs Bangladesh, 1st T20I: कर्णधार रोहित शर्मानं सांगितलं टीम इंडियाच्या पराभवाचं खरं कारण 

भारत विरुद्ध बांगलादेश पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात टीम इंडियावर पराभवाची नामुष्की ओढावली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2019 11:25 AM

Open in App

भारत विरुद्ध बांगलादेश पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात टीम इंडियावर पराभवाची नामुष्की ओढावली. भारताने विजयासाठी ठेवलेले १४९ धावांचे लक्ष्य बांगलादेशनं ७ विकेट्स राखून सहज पार केले. मुश्फिकर रहीमच्या नाबाद ६० धावांनी बांगलादेशला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. बांगलादेशने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामन्यांत प्रथमच भारतीय संघाला पराभूत करण्याचा पराक्रम केला. सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्माने भारताच्या पराभवाचं खरं कारण सांगितले. 

प्रथम फलंदाजी करताना भारताने ६ बाद १४८ धावा केल्या. या सामन्यात भारताकडून सर्वाधिक ९९ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामने खेळण्याचा विक्रम रोहितने नावावर करताना महेंद्रसिंग धोनीचा (९८) विक्रम मोडला. रोहित (९) पहिल्याच षटकात माघारी परतला. तरीही ट्वेंटी-२० सर्वाधिक धावांचा विक्रम हिटमॅनने नावावर केला. त्याने विराट कोहलीला मागे टाकले. शिखर धवन ( ४१), श्रेयस अय्यर (२२) आणि रिषभ पंत (२७) यांनी चांगला खेळ केला. कृणाल पांड्या ( १५) आणि वॉशिंग्टन सुंदर (१४) यांनी अखेरच्या षटकांत फटकेबाजी करताना संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला.

लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशला पहिल्या षटकात धक्का बसला. त्यानंतर मोहम्मद नइम (२६), सौम्या सरकार ( ३९) आणि मुश्फिकर रहीम (६०*) यांनी बांगलादेशचा विजय सूकर केला. ८ प्रयत्नानंतर बांगलादेशचा भारतीय संघावरील पहिलाच विजय ठरला. या सामन्यानंतर रोहित म्हणाला," बांगलादेशच्या खेळाडूंकडून त्यांचं श्रेय हिसकावून घेणार नाही. आम्ही फलंदाजी करत असताना पडलेल्या महत्त्वाच्या विकेट्स, क्षेत्ररक्षण करताना केलेल्या चूका, DRS घेण्यात झालेल्या चूका, याचा फटका बसला. पण, यातून आम्ही शिकलो आहे." 

 

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशरोहित शर्मारिषभ पंत