India vs Australia : धोनीच्या टीकाकारांना कोहलीचं उत्तर, त्याचं खेळपट्टीवर असणं महत्त्वाचं!
ठळक मुद्देभारतीय संघाचे वन डे मालिकेत पुनरागमनविराट कोहलीचे शतक, महेंद्रसिंग धोनीचे नाबाद अर्धशतकमालिकेतील शेवटचा सामना शुक्रवारी
अॅडलेड, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाने दुसऱ्या वन डे सामन्यात विजय मिळवून मालिकेत पुनरागमन केले. वन डे मालिकेतील अखेरचा सामना शुक्रवारी मेलबर्नवर होणार आहे आणि दोन्ही संघ मालिका जिंकण्यासाठी कंबर कसून मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत. अॅडलेडवरील सामन्यात महेंद्रसिंग धोनीला गवसलेला सूर ही भारतासाठी आणि चाहत्यांसाठी आनंदाची बाब ठरली. सिडनीतही धोनीने अर्धशतकी खेळी केली होती, परंतु त्याच्या त्या संथ खेळीमुळे भारताला पराभव पत्करावा लागला अशी टीका झाली होती. धोनीने अॅडलेडवर त्या सर्वांची तोंड बंद केली. कर्णधार विराट कोहलीनेही धोनीच्या टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले.तो म्हणाला,''धोनी बराच काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे आणि ऑस्ट्रेलियात येताच त्याच्याकडून मोठ्या फटकेबाजीची अपेक्षा करणे चुकीचे आहे. प्रवासाचा थकवा आणि येथील वातावरणाशी जुळवून घेण्यात थोडासा वेळ जातो. त्यामुळे धोनीवर टीका करणे अयोग्य होते. आज त्याने त्याच्या खेळीने टीकाकारांची तोंड बंद केली आहेत. धोनीसारखा अनुभवी खेळाडू खेळपट्टीवर असतो तेव्हा खूप मदत मिळते. त्याच्याशी सतत चर्चा करून मी रणनीती ठरवत होतो. त्याने मला घाई न करण्याचा सल्ला दिला. संयमी खेळ करून सामना जिंकू, असे तो म्हणाला. मधल्या काही षटकांत मी जोखीम उचलली, पण धोनीचं समोर असणं माझ्यासाठी महत्त्वाचे होते.''धोनीने अॅडलेडवरील सामन्यात 54 चेंडूंत 55 धावांची खेळी केली आणि त्यात दोन षटकारांचा समावेश होता. कोहली पुढे म्हणाला,''धोनी जितके आंतरराष्ट्रीय सामने खेळेल, तितका तो फॉर्मात येईल. त्याचे फॉर्मात येणे हे संघासाठी महत्त्वाचे आहे.''
39 वन डे शतकांपेक्षा ही गोष्ट कोहलीसाठी अभिमानास्पदभारतीय संघासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या युजवेंद्र चहलला पहिल्या दोन सामन्यांत अंतिम अकरामध्ये स्थान पटकावता आले नाही. त्यामुळे बीसीसीआयने त्याला भलत्याच कामाला लावले आहे. बीसीसीआयने त्याच्या नावानं चहल टीव्ही सुरू केला आहे. त्यात चहलने मंगळवारी कोहलीची छोटेखानी मुलाखत घेतली. वन डेतील 39वे शतक आणि मॅन ऑफ दी मॅच यापेक्षा चहल टीव्हीवर येणे ही माझ्यासाठी अभिमानास्पद बाब असल्याचे कोहलीने सांगितले. शिवाय चहल टीव्हीवर येण्यासाठी शतक करा किंवा पाच विकेट मिळवा, असा सल्लाही कोहलीने दिला.