मेलबोर्न : सलामीला मिळालेल्या अनपेक्षित पराभवामुळे स्तब्ध झालेला भारतीय संघ शुक्रवारी आॅस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या टी-२० लढतीला सामोरे जाण्याआधी संघात बदल करण्याच्या विचारात आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत यजमान संघ १-० ने पुढे आहे.
सलग सात द्विपक्षीय टी२० मालिका जिंकणारा विराट कोहलीचा संघ गोलंदाजी आणि फलंदाजी संयोजनात काही बदल करू
इच्छितो. लोकेश राहुल सध्या खराब फॉर्ममध्ये आहे. इंग्लंडविरुद्ध मॅनचेस्टर येथे पहिल्या टी२० त नाबाद १०१ धावा ठोकणारा हा फलंदाज पुढील सहा सामन्यात ३० पेक्षा अधिक धावा काढू शकला नाही. तो तिस-या तर कोहली चौथ्या स्थानावर खेळतो. कसोटी मालिकेत मधल्या फळीत खेळण्याआधी राहुलला फॉर्ममध्ये यावेच लागेल.
याशिवाय अष्टपैलू कृणाल पांड्याने चार षटकांत ५५ धावांची खैरात केल्याने त्याच्या जागी यझुवेंद्र चहलला खेळविण्याचा कोहलीचा विचार आहे. पांड्याला बाहेर केल्यास एक फलंदाजही कमी होईल.
याशिवाय पहिल्या सामन्यात क्षेत्ररक्षणातही भारत कमी पडला होता. ब्रिस्बेनमध्ये कोहलीने स्वत: दोनदा चूक केली. प्रतिस्पर्धी कर्णधार अॅरोन फिंचचा त्याने झेल सोडला, शिवाय मिसफिल्डही केले होते. पाच दिवसांत तीन सामन्यांचे आयोजन असल्याने चुकांवर तोडगा काढण्यास भारताकडे फारसा वेळ नाही. आॅस्ट्रेलियातील मैदाने मोठी असल्याने येथे चौकार मारण्याचे देखील आव्हान असते. दुसरीकडे आॅस्ट्रेलियासाठी अॅडम झम्पा लाभदायी ठरला. या आठवड्यात मेलबोर्नमध्ये वेगवान वारे वाहत असून सामन्यावर पावसाचे संकट कायम आहे. (वृत्तसंस्था)
प्रतिस्पर्धी संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, कृणाल पांड्या, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, खलील अहमद आणि वॉशिंग्टन सुंदर.
आॅस्ट्रेलिया : अॅरोन फिंच (कर्णधार) एस्टन एगर, ज्जेसन बेहरेनडोर्फ, अॅलेक्स कारे, नाथन कूल्टर नाइल, ख्रिस लिन, बेन मॅक्डरमोट, ग्लेन मॅक्सवेल, डीआर्सी शार्ट, बिली स्टॉनलेक, मार्कस स्टोयनिस, अॅन्ड्र्यू टाय आणि अॅडम झम्पा.