Join us  

India vs Australia : गॅबावरील ऐतिहासिक विजयानंतर अजिंक्य रहाणे झाला भावूक, म्हणाला शब्दच सूचत नाही!

India vs Australia, 4th Test Day 5 :  टीम इंडियानं अजिंक्य रहाणेच्या ( Ajinkya Rahane) नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर इतिहास रचला.

By स्वदेश घाणेकर | Published: January 19, 2021 2:02 PM

Open in App

India vs Australia, 4th Test Day 5 :  टीम इंडियानं अजिंक्य रहाणेच्या ( Ajinkya Rahane) नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर इतिहास रचला.  प्रमुख खेळाडू जायबंदी होत असताना अजिंक्यनं मोठ्या कौशल्यानं सहकाऱ्यांना सोबत घेऊन एकजुटीनं कांगारूंचा सामना केला आणि इतिहास घडवला. शुबमन गिल ( Shubman Gill), रिषभ पंत ( Rishabh Pant) आणि चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) यांनी शानदार खेळ केला. ऑस्ट्रेलियानं ठेवलेले ३२८ धावांचे लक्ष्य टीम इंडियानं ३ विकेट्स राखून पार केले. या विजयाबद्दल बोलताना अजिंक्य रहाणे थोडा भावूक झाला...

शुबमन गिलने १४६ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह ९१ धावा करून टीम इंडियाच्या विजयाचा पाया रचला. ऑसी गोलंदाजांचा मारा शरिरावर झेलूनही चेतेश्वर पुजारा खेळपट्टीवर नांगर रोवून उभा राहिला. त्यानं २११ चेंडूंचा सामना करताना ५६ धावा केल्या. कर्णधार अजिंक्य रहाणेनं आक्रमक खेळी करताना टीम इंडियाच्या विजयासाठी प्रयत्न केले, परंतु त्याला मोठी खेळी करता आली नाही.  रहाणे २२ चेंडूंत २४ धावांत माघारी परतला. रिषभनं आक्रमक खेळ केला. त्यानं १३८ चेंडूंत ९ चौकार व १ षटकार खेचून नाबाद ८९ धावा करताना विजयी चौकार खेचला. 

या विजयानंतर अजिंक्य रहाणे म्हणाला,''हा विजयाचे महत्त्व शब्दात सांगणे अवघड आहे. मलाच कळत नाही, या विजयाबद्दल मी काय बोलू. मला या मुलांचा अभिमान आहे, प्रत्येकाचा. आम्हाला सर्वोत्तम द्यायचे होते आणि त्यामुळे आमच्या कोणाच्याही डोक्यात निकालाचा विचार नव्हता. मी खेळपट्टीवर होतो, तेव्हा चेतेश्वर पुजाराला मी टिकून खेळण्याचा सल्ला दिला आणि मी आक्रमक खेळ करण्याचे ठरवले. मागे रिषभ पंत व मयांक अग्रवाल आहे हे आम्हाला माहित होतं. तणावाच्या स्थितीतही पुजारानं जो खेळ केला, त्याचं विशेष कौतुक. रिषभ पंतनं अविश्वसनीय खेळ केला.''

''२० विकेट्स घेणे हे खूप महत्त्वाचे आहे. या आत्मविश्वासानचं आम्ही पाच गोलंदाज खेळवण्याचा निर्णय घेतला. वॉशिंग्टन सुंदरनं गोलंदाजीची बाजू संतुलित केली. सिराजकडे दोन कसोटीचा अनुभव, सैनी-ठाकूरकडे एक, नटराजननं पदार्पण केलं, या सर्वांना श्रेय द्यायला हवं. अॅडलेड कसोटीतील पराभवाची आम्ही चर्चाही केली नाही. आम्हाला आमचा खेळ खेळायचा होता. हा एकाचा नाही, तर संघाचा विजय आहे,''असेही अजिंक्य म्हणाला.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाअजिंक्य रहाणेरिषभ पंतचेतेश्वर पुजाराशुभमन गिल