सिडनी - बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतील तिसऱ्या कसोटीच्या शेवटच्या दिवशी भारतीय संघासमोर मोठे आव्हान आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ४०७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची अवस्था २ बाद ९८ अशी झाली आहे. दरम्यान, रिषभ पंत आणि रवींद्र जडेजा हे फलंदाज जखमी असल्याने भारतीय संघासमोरील आव्हान अधिकच खडतर बनले आहे. अशा परिस्थितीत आता भारतीय संघाला दिलासा देणारी माहिती समोर येत आहे. रिषभ पंत हा उद्या फलंदाजी करू शकेल अशी अपडेट्स मिळाल्यानंतर आता रवींद्र जडेजाबाबतही महत्त्वाची माहिती मिळत आहे. भारतीय संघाला गरज पडल्यास रवींद्र जडेजा हा फलंदाजीस उतरणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
सिडनी कसोटीत पहिल्या डावात फलंदाजी करत असताना मिचेल स्टार्कचा उसळता चेंडू जडेजाच्या डाव्या हाताच्या ग्लव्हजवर जोरात बसला होता. त्यामुळे जडेजाला दुखापत झाली होती. त्यानंतर करण्यात आलेल्या निदानामध्ये ही दुखापत गंभीर असल्याचे निष्पन्न झाले होते. या दुखापतीमुळे जडेजाला दुसऱ्या डावात गोलंदाजी करता आळी नव्हती. आता त्याला या मालिकेतील शेवटचा सामना तसेच इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांना मुकावे लागणार आहे. मात्र असे असले तरी रवींद्र जडेजा सोमवारी सामन्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय संघाला गरज पडल्यास इंजेक्शन घेऊन फलंदाजी करणार आहे. भारतीय संघासाठी दिलासादायक बाब म्हणजे रिषभ पंतही दुसऱ्या डावात फलंदाजी करणार आहे.
सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी ४०७ धावांचे आव्हान ठेवले आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दोन बाद ९८ धावा केल्या होत्या. भारताला हा सामना जिंकण्यासाठी अजून ३०९ धावांची गरज आहे.