नवी दिल्ली, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : उस्मान ख्वाजा ( 100) आणि पीटर हँड्सकोम्ब ( 52) यांच्या फटकेबाजीनंतर अन्य फलंदाजांनी पत्करलेल्या हाराकिरीमुळे ऑस्ट्रेलियाला 9 बाद 272 धावाच करता आल्या. पाचव्या वन डे सामन्यात विजय मिळवून मालिका खिशात घालण्यासाठी भारतासमोर 273 धावांचे लक्ष्य आहे. भारताच्या जसप्रीत बुमराने सर्वात प्रभावी गोलंदाजी करताना ऑसींच्या धावगतीवर चाप लगावला. पण, त्याच्या अखेरच्या दोन षटकांत ऑस्ट्रेलियाने ती कसर भरून काढली. भुवनेश्वर कुमारने तीन, तर रवींद्र जडेजा व मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. कुलदीप यादव (74) सर्वात महागडा गोलंदाज ठरला. या लक्ष्याचा पाठलाग करून भारताला 1996 चा विक्रम मोडण्याची संधी आहे.
पाचव्या वन डे सामन्यात पाहुण्या ऑस्ट्रेलियाने दमदार सुरुवात केली. नाणेफेकीचा कौल बाजूनं लागल्यानंतर ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अॅरोन फिंच आणि उस्मान ख्वाजा यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर पीटर हँड्सकोम्बनं दुसऱ्या विकेटसाठी ख्वाजासह चांगली जोडी जमवली. ख्वाजानं या शतकी खेळी करत मालिकेत सातत्यपूर्ण कामगिरीचे दर्शन घडवले. त्याने या कामगिरीसह भारतीय खेळपट्टींवर आपलं नाणं खणखणीत वाजवत एबी डिव्हिलियर्स आणि केन विलियम्सन या दिग्गज फलंदाजांना मागे टाकले.
पण, ख्वाजा बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या तळाच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा करताना ऑसीच्या धावगतीवर चाप बसवला. 8 षटकांत केवळ 14 धावा देणाऱ्या जसप्रीत बुमराच्या अखेरची दोन षटकं महागात पडली. ऑस्ट्रेलियाने अखेरच्या पाच षटकांत 3 विकेट गमावत 44 धावा केल्या आणि त्यात बुमराहे 25 धावा दिल्या होत्या. त्यामुळे भारताला विजयासाठी 273 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे.
भारतीय संघाने हे लक्ष्य पार केल्यास कोटलावर यशस्वी पाठलाग करण्याची ही दुसरी सर्वोत्तम खेळी ठरेल. कोटलावर भारताने 1982 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 278 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. त्यानंतर 1966 मध्ये श्रीलंकेने कोटलावरच भारताच्या 272 धावांचे लक्ष्य पार केले होते आणि आज हा विक्रम मोडण्याची संधी भारताला आहे.