ठळक मुद्देविराट कोहली व अजिंक्य रहाणे यांचे अर्धशतककोहली व रहाणेची चौथ्या विकेटसाठी नाबाद 90 धावांची भागीदारीकोहलीने तिसऱ्या विकेटसाठी पुजारासह 74 धावा जोडल्या
पर्थ, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया: कर्णधार विराट कोहलीची संयमी खेळी आणि त्याला मिळालेली चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे यांची साजेशी साथ यांच्या जोरावर भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत कमबॅक केले आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 326 धावांवर गुंडाळल्यानंतर मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाचे दोन्ही सलामीवीर अवघ्या 8 धावांवर माघारी परतले. मात्र, कोहलीने सुरुवातीला पुजारा आणि नंतर रहाणेसह अर्धशतकी भागीदारी केली आणि संघाला दुसऱ्या दिवसअखेर 3 बाद 172 धावा केल्या. कोहली 82 धावांवर, तर रहाणे 51 धावांवर खेळत असून भारत अद्याप 154 धावांनी पिछाडीवर आहे.
दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 49 धावांची भर घातली. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 326 धावांत गुंडाळण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले. कर्णधार टीम पेन आणि पॅट कमिन्स यांनी सातव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून भारताची डोकेदुखी वाढवली. उमेश यादवने कमिन्सला बाद करून दुसऱ्या दिवसातील पहिले यश मिळवून दिले. त्यापाठोपाठ जसप्रीत बुमराने पेनला माघारी पाठवले. सेट जोडी माघारी परतल्यानंतर इशांत शर्माने तळाचे फलंदाज बाद करून ऑस्ट्रेलियाचा डाव 326 धावांत गुंडाळला. शर्माने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. त्याला बुमरा, शर्मा आणि हनुमा विहारी यांनी प्रत्येकी दोन विकेट घेत चांगली साथ दिली.
भारताची सुरुवात निराशाजनक झाली. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील 326 धावांचा पाठलाग करताना भारताला तिसऱ्याच षटकात धक्का बसला. मिचेल स्टार्कच्या अप्रतिम चेंडूवर सलामीवीर मुरली विजय भोपळा न फोडताच माघारी परतला. त्यानंतर सहाव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर जोश हेझलवुडने लोकेश राहुलचा त्रिफळा उडवला. कोहली व पुजारा ही जोडी संयमाने खेळ केला. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 74 धावा जोडल्या. स्टार्कने पुजाराला ( 24) बाद केले. त्यानंतर कोहलीने रहाणेसह दिवसअखेरपर्यंत खिंड लढवली.