Join us  

India vs Australia, 2nd Test : रिषभ पंतच्या विकेटमुळे मिचेल स्टार्क व टीम पेन यांच्या नावावर नोंदवला मोठा पराक्रम

India vs Australia, 2nd Test : अजिंक्य रहाणेनं कॅप्टन्स इनिंग खेळताना टीम इंडियाला आघाडीच्या दिशेनं वाटचाल करून दिली. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाच्या प्रत्युत्तरात भारतानं ६२ षटकांत ५ बाद १८५ धावा केल्या आहेत.

By स्वदेश घाणेकर | Published: December 27, 2020 9:42 AM

Open in App

India vs Australia, 2nd Test : अजिंक्य रहाणेनं कॅप्टन्स इनिंग खेळताना टीम इंडियाला आघाडीच्या दिशेनं वाटचाल करून दिली. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाच्या प्रत्युत्तरात भारतानं ६२ षटकांत ५ बाद १८५ धावा केल्या आहेत. वृद्धीमान साहाच्या जागी संघात स्थान मिळालेल्या रिषभ पंतला ( Rishabh Pant) मोठी खेळी करण्याची संधी होती. त्यानं आक्रमक खेळ करून तसा विश्वास दाखवला, पण मिचेल स्टार्कनं त्याला बाद केले. पंतच्या या विकेटनं स्टार्क व यष्टिरक्षक टीम पेन यांच्या नावावर विक्रमाची नोंद झाली. 

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९५ धावांवर गुंडाळल्यानंतर टीम इंडियावर जबाबदारी आहे ती मोठी आघाडी घेण्याची. पहिल्या दिवशी मयांक अग्रवाल भोपळा न फोडता माघारी परतला, परंतु पदार्पणवीर शुबमन गिल ( Shubhaman Gill) आणि चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) यांनी टीम इंडियाला सावरले. गिलनं काही सुरेख फटके मारून त्याची निवड सार्थ असल्याचे सिद्ध केले. त्यानं आक्रमक खेळावर अधिक भर दिला आणि त्यामुळे टीम इंडियाचा धावांचा वेगही चांगला राहिला. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात ऑसी गोलंदाजांनी वेगवान मारा करताना गिल व पुजाराला चाचपडवले. दोघांना जीवदानही मिळाले. पण, अखेरीस पॅट कमिन्सनं त्यांना माघारी जाण्यास भाग पाडले.

दुसऱ्या दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर पुजारासाठी ऑसींनी DRS घेतला, परंतु तो अपयशी ठरला. २२व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर ऑसींना दिवसाचे पहिले यश मिळाले. ६५ चेंडूंत ८ चौकारांसह ४५ धावा करणारा गिल कमिन्सच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक टीम पेनच्या हाती झेल देऊन माघारी परतला. पुजारा १७ धावांवर बाद झाला. भारतानं पहिल्या सत्रात २६ षटकांत ५४ धावा करून २ विकेट्स गमावल्या. कर्णधार अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारी यांनी ऑसी गोलंदाजांचा धैर्यानं सामना केला. दोघांनी संयमी खेळी करताना ५२ धावांची भागीदारी केली. नॅथन लियॉननं त्यांची एकाग्रता भंग केली अन् जोरदार फटका मारण्याच्या नादात विहारी ( २१) झेलबाद झाला.

संघात पुनरागमन करणाऱ्या रिषभ पंतनं आक्रमक खेळावर भर दिला. त्यानं ऑसींचा प्रमुख गोलंदाज पॅट कमिन्स यालाच लक्ष्य केले. पंतच्या आक्रमक खेळीमुळे ऑसींना त्यांचे डावपेच बदलावे लागले. पंतनं पाचव्या विकेटसाठी अजिंक्यसह ७३ चेंडूंत ५० धावांची भागीदारी केली. मिचेल स्टार्कनं पंतला माघारी जाण्यास भाग पाडले. २९ धावांवर तो माघारी परतला. 

पंतच्या विकेटनं मिचेल स्टार्क व टीम पेन यांच्या नावावर विक्रम नोंदवला. स्टार्कची ही कसोटी क्रिकेटमधील २५० वी विकेट ठरली. त्यानं सर्वात कमी ११९७६ चेंडूंत हा पल्ला गाठून मिचेल जॉन्सनचा ( १२५७८ चेंडू) विक्रम मोडला.

टीम पेनचा हा कसोटीतील १५०वा बळी ठरला. त्यानं सर्वात कमी म्हणजेच ३३ कसोटीत हा पल्ला गाठून अॅडम गिलख्रिस्टचा ( ३६ कसोटी) विक्रम मोडला.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारिषभ पंतअजिंक्य रहाणेचेतेश्वर पुजारामयांक अग्रवालशुभमन गिल