ठळक मुद्देपर्थवर लोकेश राहुलचा पुन्हा अपयशाचा पाढा वाचला.दोन्ही डावांत मिळून केल्या दोन धावापृथ्वी शॉला खेळवण्याची मागणी
मुंबई, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : ॲडलेड कसोटीच्या दुसऱ्या डावात लोकेश राहुलने 44 धावा करताना फॉर्मात परतल्याचे संकेत दिले. मात्र, पर्थवर त्याने पुन्हा अपयशाचा पाढा वाचला. पहिल्या डावात दोन आणि दुसऱ्या डावात भोपळाही न फोडता तो माघारी परतला. त्यामुळे त्याला आणखी किती संधी देणार हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 'विराट'कृपेमुळे संघात स्थान टिकवण्यात यशस्वी ठरलेल्या राहुलला मैदानावर कामगिरी करावी लागते याचा विसर पडला आहे. त्यामुळे त्याच्या जागी मुंबईचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ याला संधी देण्याची मागणी जोर धरत आहे.
ॲडलेड कसोटीत राहुलला नशिबाने साथ दिली.
पृथ्वी शॉ दुखापतग्रस्त झाला नसता तर कदाचित ( कोण जाणे कोहलीने तरी त्यालाच खेळवले असते) राहुलला संधी मिळाली नसती. सराव सामन्यात पृथ्वीला झालेली दुखापत राहुलच्या फायद्याची ठरली. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत सातत्याने अपयशी ठरुनही राहुल पाचही कसोटी खेळला. तेच शिखर धवन आणि मुरली विजय या दुसऱ्या सलामीवीरांना वेगळा न्याय देण्यात आला. विजयला तर तीन सामन्यानंतर संघातूनच डावलले.
राहुल गुणवान खेळाडू आहे, यात दुजाभाव नसला तरी त्याची सध्याची कामगिरी टीकेस पात्र आहे. भारताला सलामीचा प्रश्न नेहमी सतावत आला आहे. विशेषतः परदेश दौऱ्यावर तो प्रकर्षाने जाणवतो. अशा वेळी वारंवार संधी देउनही राहुल अपयशी ठरत असेल, तर मग त्याला पर्याय शोधायला हवा. कोहलीच्या आरक्षण पॉलिसीमुळे राहुलला आता संधी मिळालीय. पण मैदानावर त्यालाच खेळायचे आहे. इथे कोहली स्वतःच्या धावा राहुलला देणार नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील अपयशानंतर तरी राहुलला बाकावर बसवा, अशी मागणी होत आहे.
![]()