ठळक मुद्देपहिल्या वन डे सामन्यात भारताची दमदार सुरुवात भुवनेश्वर कुमारने ऑसी कर्णधार अॅरोन फिंचला केले बाद
सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : कसोटी मालिकेतील ऐतिहासिक विजयानंतर मनोबल उंचावलेल्या भारतीय संघाने वन डे मालिकेतही दमदार सुरुवात केली. नाणेफेकीचा कौल यजमान ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला असला तरी भारताने तिसऱ्याच षटकात कांगारूंना धक्का दिला. कसोटी मालिकेत खेळण्याची संधी न मिळालेल्या भुवनेश्वर कुमारने भारताला पहिले यश मिळवून दिले. त्याने तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर ऑसी कर्णधार अॅरोन फिंचचा त्रिफळा उडवला आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना एका विक्रमाच्या बाबतीत पिछाडीवर टाकले.
फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. फेब्रुवारी 2018 पासून झालेल्या 23 वन डे सामन्यांत ऑस्ट्रेलियाला केवळ 3 सामने जिंकता आले आहेत. त्यामुळे 2019 मध्ये चांगल्या कामगिरीचे त्यांचे लक्ष्य आहे. मे-जून मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या दृष्टीनेही त्यांच्यासाठी ही मालिका महत्त्वाची आहे. पण, सामन्याच्या तिसऱ्याच षटकात फिंच माघारी परतला. भुवनेश्वरने त्याचा त्रिफळा उडवत कांगारूंना पहिला धक्का दिला.
या विकेटसह भुवनेश्वरने वन डे क्रिकेटमध्ये विकेटचे शतक साजरे केले. त्याला पहिले अर्धशतक साजरे करण्यासाठी 49 डाव खेळावे लागले, दुसऱ्या पन्नास विकेट्स त्याने 47 डावांत घेतल्या. या कामगिरीसह त्याने मुख्य प्रशिक्षक
रवी शास्त्री यांना मागे टाकले. भुवनेश्वरने 96 डावांत शंभर विकेट घेतल्या. शास्त्रींना 100 विकेट घेण्यासाठी 100 डाव खेळावे लागले होते. वेंकटेश प्रसाद व रवींद्र जडेजा यांनी 85 डावांत 100 विकेट घेतल्या होत्या.