U19 World Cup Semi Final, India vs Australia : भारताच्या १९ वर्षांखालील संघाच्या १२.३ षटकांत २ बाद ३७ असा धावफलक असताना कर्णधार यश धुल ( Yash Dhull) मैदानावर उतरला आणि त्यानं शेख राशिदसह ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षांखालील संघाची धुलाई केली. या दोघांच्या द्विशतकीय भागीदारीच्या जोरावर भारतानं ५० षटकांत ५ बाद २९० धावांचा डोंगर उभा केला. यश धुलनं शतकी खेळी करताना इतिहास रचला, तर राशिदचे शतक अवघ्या ६ धावांनी हुकले.
अंगक्रीश रघुवंशी ( ६) व हर्नूर सिंग ( १६) हे सलामीवीर माघारी परतल्यानंतर यश व राशिद यांनी दमदार खेळ केला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी २०४ धावांची भागीदारी केली. यश ११० चेंडूंत १० चौकार १ षटकारासह ११० धावांवर बाद झाला. त्यापाठोपाठ राशिदही १०८ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारासह ९४ धावांवर बाद झाला. दिनेश बानानं ४ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह नाबाद २० धावा करून संघाला २९० धावांपर्यंत पोहोचवले. भारतानं अखेरच्या १० षटकांत १०८ धावा चोपल्या.
१९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत भारताच्या कर्णधारानं शतक झळकावल्याची ही तिसरी वेळ आहे. याआधी विराट कोहलीनं २००८मध्ये वेस्ट इंडिज आणि उन्मुक्त चंदने २०१२मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावले होते. हे तिघंही खेळाडू दिल्लीचे आहेत आणि २००८ व २०१२ मध्ये आपण वर्ल्ड कप जिंकला होता.