Join us  

ICC U-19 World Cup 2018: शुभम(न) भवतु; टीम इंडियाकडून पाकिस्तानचा धुव्वा; वर्ल्ड कप एका पावलावर

अंडर 19 वर्ल्डकपमधील सेमीफायनल सामन्यात भारताने पाकिस्ताननचा तब्बल 203 धावांनी पराभव करत थेट अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2018 9:17 AM

Open in App

ख्राईस्टचर्च - अंडर 19 वर्ल्डकपमधील आपली विजयी घोडदौड भारतीय संघाने कायम ठेवली असून क्रिकेटमधील पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा दणदणीत पराभव केला आहे. भारताने पाकिस्ताननचा तब्बल 203 धावांनी पराभव करत अंतिम सामन्यात दणक्यात प्रवेश केला आहे. भारताची आतापर्यंतची कामगिरी पाहता वर्ल्ड कप जिंकण्याची पुरेपूर संधी संघाकडे आहे. शुभमन गिलने फटकावलेल्या नाबाद शतकाच्या जोरावर भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानसमोर विजयासाठी 273 धावांचे आव्हान ठेवले होते. पाकिस्तान संघ मात्र फक्त 69 धावांतच गारद झाला. अंतिम सामन्यात भारत ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे.    

भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाने निर्धारीत 50 षटकांत  9 बाद 272 धावा फटकावल्या.  शुभमन गिल याने फटकावलेले नाबाद आणि कर्णधार पृथ्वी शॉ आणि मनज्योत कालरा यांच्यातील दणदणीत सलामी भागीदारी हे भारतीय संघाच्या डावाचे वैशिष्ट्य ठरले. पृथ्वी शॉ आणि कालरा बाद झाल्यानंतर भारतीय फलंदाजीची सूत्रे आपल्या हाती घेणाऱ्या शुभमनने अखेरपर्यंत एक बाजू लावून धरली. डावातील शेवटच्या षटकात आपले शतक पूर्ण करणाऱ्या गिलने 94 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने नाबाद 102 धावा फटकावल्या. 

273 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्तान संघाचा एकही फलंदाज चांगली खेळी करु शकला नाही. परिणामी एकामागोमाग एक फलंदाज तंबूत परतत होते. 50 धावा पुर्ण करण्याआधीच पाकिस्तानचा अर्धा संघ तंबूत परतला होता. 20 ओव्हर्सनंतर पाकिस्तानची परिस्थिती 45 धावांवर सहा विकेट अशी झाली होती. अखेर 69 धावांत संपुर्ण संघ गारद झाला आणि भारताने अंतिम सामन्यात प्रवेश केला. भारताकडून ईशान पोरेलने चार तर शिवा सिंग आणि आर परागला प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. 

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारल्यावर कर्णधार पृथ्वी शॉ आणि मनज्योत कार्ला यांनी भारताला दमदार सुरुवात करून दिली . पाकिस्तानच्या गचाळ क्षेत्ररक्षणामुळे मिळालेल्या जिवदानांचा पुरेपूर फायदा उठवत त्यांनी संघाला 89 धावांची सलामी दिली. यादरम्यान, पृथ्वी शॉ 41 धावांवर बाद झाला. तर मनज्योत कालरा 47 धावा काढून माघारी परतला. त्यानंतर शुभमन गिल याने पाकिस्तानी गोलंदाजांचा समाचार घेत भारताचा डाव सावरला. शुभमने 94 चेंडूत 102 धावा काढत पाकिस्तानी गोलंदाजांची अक्षरक्ष: पिसं काढली.  भारतीय संघ वर्ल्ड जिंकण्यापासून फक्त एक पाऊल दूर असून अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाशी सामना होणार आहे.  

टॅग्स :19 वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धाभारतपृथ्वी शॉ