Join us
Daily Top 2Weekly Top 5

वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला पुन्हा एकदा पराभूत करा, सांगतोय सचिन तेंडुलकर

मला तरी असे वाटते की आपण पाकिस्तानला दोन गुण देऊ नये.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2019 18:03 IST

Open in App

मुंबई : पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानशी वर्ल्ड कपमध्ये खेळावं की नाही, हा मुद्दा सध्या ऐरणीवर आहे. बीसीसीआयने हा चेंडू केंद्र सरकारच्या कोर्टात टाकला आहे. या प्रश्नावर आता भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरने आपले मत व्यक्त केले आहे.

सचिन म्हणाला की, " भारताने नेहमीच पाकिस्तानविरुद्ध चांगलीच कामगिरी केली आहे. आता पुन्हा एकदा त्यांना मैदानात पराभूत करायला हवे. जर पाकिस्तानबरोबर आपण खेळलो नाही तर आपल्याकडून त्यांना दोन गुण बहाल होतील. त्यामुळे मला तरी असे वाटते की आपण पाकिस्तानला दोन गुण देऊ नये. पण माझ्यासाठी देश जो निर्णय घेईल तोच योग्य असेल."

 

आतापर्यंत भारताने वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्धचा एकही सामना गमावलेला नाही.

भारताचे माजी महान सलामीवीर सुनील गावस्कर यांनी काही दिवसांपूर्वी या प्रश्नावर आपले मत व्यक्त केले होते. गावस्कर म्हणाले की, " पाकिस्तानला वर्ल्डकपमध्ये खेळू देऊ नये, त्यांच्यावर बंदी आणावी, असे काही जण म्हणत आहेत. पण ही गोष्ट तेवढी सोपी नाही. कारण भारत एकटा ही गोष्ट करू शकत नाही. जर भारताला पाकिस्तानवर बंदी आणायची असेल तर त्यांना अन्य काही देशांचाही पाठिंबा लागेल. त्याचबरोबर भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्धचा सामना न खेळायचे ठरवले तर यामध्ये भारताचेच नुकसान आहे." 

विश्वचषकातील सामन्यांवर यापूर्वी काही संघांनी टाकला होता बहिष्कारऑस्ट्रेलियाच्या संघाने 1996 साली झालेल्या विश्वचषकात सुरक्षेच्या कारणास्तव श्रीलंकेत न खेळण्याचा निर्णय घेतला होता. वेस्ट इंडिजच्या संघानेही या विश्वचषकात श्रीलंकेमध्ये खेळण्यास असमर्थता दर्शवली होती. दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि केनिया या देशांमध्ये संयुक्तरीत्या 2003 साली विश्वचषक झाला होता. इंग्लंडच्या संघाने यावेळी झिम्बाब्वेमध्ये खेळण्यास नकार दिला होता. या विश्वचषकात न्यूझीलंडने केनियातील नैरोबी येथील सामन्यात आम्ही खेळणार नाही, हे स्पष्ट केले होते.

भारताने पाकिस्तानबरोबर खेळायला हवे, सांगतोय ऑलिम्पिकपदक विजेता सुशील कुमारपुलवामा दशहतवादी हल्ल्यानंतर भारतीय संघाने वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानसोबत खेळू नये, अशी मागणी जोर धरत आहे. पण भारतासाठी दोन ऑलिम्पिकपदके जिंकून इतिहास रचणाऱ्या कुस्तीपटू सुशील कुमारचे मत मात्र यापेक्षा वेगळे आहे. हा हल्ला दुर्देवी असाला तरी भारताने पाकिस्तानशी खेळायला हवे, असे मत सुशील कुमारने व्यक्त केले आहे. 

सुशील म्हणाला की," पुलवामा येथील हल्ला निंदनीय आहे. मी भारताच्या जवानांना सलाम करतो. मी त्यांना सांगू इच्छितो की, संपर्ण देश तुमच्या पाठिशी आहे. पण या हल्ल्यानंतरही मला असे वाटते की भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळायला हवे. कारण खेळामुळे दोन्ही देशांतील संबंध चांगले राहतील आणि खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल." 

टॅग्स :सचिन तेंडुलकरसुनील गावसकरपुलवामा दहशतवादी हल्ला