भारतीय क्रिकेट संघाने काल (८ मार्च २०२६) रोजी क्रिकेटच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी आपली नोंद केली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी धुव्वा उडवत तिसऱ्यांदा आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक आपल्या नावावर केला. यजमान देश म्हणून विश्वचषक जिंकणारा आणि विजेतेपद यशस्वीरित्या राखणारा भारत हा जगातील पहिला संघ ठरला आहे. मात्र, या दिमाखदार विजयानंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने वादग्रस्त विधान केले आहे.
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने टॅपमॅडच्या गेम ऑन है या शोमध्ये भारताच्या विजयावर टीका करताना अजब तर्क मांडला, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत शोएब अख्तर असे म्हणतोय की, "हे असे आहे की, शेजारच्या एखाद्या श्रीमंत मुलाने गरीब मुलांना बोलावून म्हणावे, चला, क्रिकेट खेळूया... भारत सध्या हेच करत आहे. ते स्पर्धेत सोयीनुसार संघ ठेवतात, त्यांना हवे तसे करतात आणि मग आम्ही जिंकलो असे म्हणतात. माझ्या मते, त्यांनी क्रिकेट पूर्णपणे उद्ध्वस्त केलं आहे."
अख्तरच्या या विधानामुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली असून, भारतीय चाहत्यांनी ही त्याची जळफळाट असल्याची टीका केली आहे. विशेष म्हणजे, अंतिम सामन्यापूर्वी अख्तरने भारताला मजबूत संघ म्हटले, तरीही त्याने क्रिकेटच्या हितासाठी न्यूझीलंडने जिंकावे, अशी इच्छा व्यक्त केली होती.