राजकोट, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : मुंबईच्या पृथ्वी शॉ याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघात अखेर संधी मिळाली. BCCI ने या युवा खेळाडूवर विश्वास दाखवत कसोटी पदार्पणाची संधी दिली. स्थानिक क्रिकेटमध्ये सातत्याने धावा करणाऱ्या पृथ्वीवर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही तशाच कामगिरीची अपेक्षा आहे. शिखर धवन आणि मुरली विजय हे अनुभवी सलामीवीर अपयशी ठरल्यामुळे पृथ्वीला सलामीचे स्थान पक्के करण्याची हीच संधी आहे.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना राजकोट येथे आजपासून सुरू होणार आहे. त्या सामन्यात पृथ्वी कसोटी संघात पदार्पण करणार आहे. पृथ्वीच्या खेळाशी तुलना नेहमी महान फलंदाज
सचिन तेंडुलकर याच्याशी करण्यात आली आहे. 2013 मध्ये सचिनने अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला आणि त्याच वर्षी 14 वर्षीय पृथ्वीने हॅरिस शिल्ड आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत 330 चेंडूंत 546 धावांची विक्रमी खेळली. त्यामुळे नव्या सचिनचा उदय असे त्याला संबोधण्यात आले. पृथ्वीने 2018 मध्ये भारताला 19 वर्षांखालील विश्वचषकही जिंकून दिला आहे.
![]()
पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात मैदानावर पाऊल ठेवण्याआधीच पृथ्वीने मास्टर ब्लास्टर तेंडुलकर याच्या अनोख्या विक्रमाजवळ झेप घेतली. पृथ्वीने केवळ 14 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत आणि इतका कमी अनुभव असूनही कसोटीत पदार्पण करणारा तो दुसरा खेळाडू आहे. हा विक्रम तेंडुलकरच्या नावावर आहे. तेंडुलकरने कसोटी पदार्पण केले त्यावेळी त्याच्याकडे केवळ 9 प्रथम श्रेणी सामन्यांचा अनुभव होता.