India vs Sri Lanka, 2nd T20I Live Updates : भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. स्वींग घेणाऱ्या खेळपट्टीवर श्रीलंकेच्या सलामीवीरांना सावध पवित्रा घेत विकेट टिकवण्यावर भर दिला. पहिल्या चार षटकांत श्रीलंकेने १५ धावा केल्या होत्या, त्यानंतर हर्षल पटेलने टाकलेल्या पाचव्या षटकात १० धावा जोडल्या आणि धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला. दानुष्का गुणतिलका व पथून निसांका यांचा सावध खेळ सुरू असताना टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) काहीसा नाराज दिसला आणि त्याने थेट मैदानावरील पंचांकडे तक्रार केली.
भारत-श्रीलंका यांच्यातला दुसरा ट्वेंटी-२० सामना धरमशाला येथे सुरू आहे. भारताचा कर्णधार
रोहित शर्मा ( Rohit Sharma) याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने पहिल्या सामन्यात ६२ धावांनी विजय मिळवून तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या सामन्यात रोहित व इशान किशन यांनी पहिल्या विकेटसाठी १११ धावांची भागीदारी केली होती. रोहित ४४ धावांवर माघारी परतल्यानंतर इशानने ८६ धावांची खेळी साकारली, तर श्रेयस अय्यरने झटपट अर्धशतक झळकावले होते. रोहितने संघात कोणताच बदल केलेला नाही.
भुवनेश्वर कुमार व जसप्रीत बुमराह यांनी पहिली चार षटकं अप्रतिम फेकली. जसप्रीतच्या दुसऱ्याच षटकात भारताने DRS घेतला, परंतु तो वाया गेला. मागील सामन्यात पहिल्या दोन षटकांत श्रीलंकेला धक्का देणाऱ्या भुवीला यावेळी यश मिळाले नाही. पण, त्याने उल्लेखनीय गोलंदाजी केली. दरम्यान, तिसऱ्या षटकात रोहित नाराज दिसला. भुवनेश्वरने तिसऱ्या षटकातील दोन चेंडू टाकल्यानंतर स्लीपमध्ये उभा असलेला रोहित पंचांकडे आला आणि तो प्रचंड नाराज दिसला. समोर असलेल्या साईड स्क्रीनच्या बाजूला दोन मोठे जाहीरात फलक लावले होते आणि त्यामुळे स्लीपमध्ये उभं राहून क्षेत्ररक्षण करणे अवघड असल्याचे रोहित पंचांना सांगत होता. त्यानंतर रोहित स्लीपमधून दुसरीकडे क्षेत्ररक्षणासाठी उभा राहिला.