भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी (१४ फेब्रुवारी २०२६) -२० विश्वचषक २०२६ मधील सर्वात मोठा आणि हाय-व्होल्टेज सामना रंगणार आहे. हा सामना श्रीलंकेतील कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाणार आहे. मात्र, त्याआधी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने भारताचा स्टार फलंदाज अभिषेक शर्माबद्दल वादग्रस्त विधान करून नवा वाद ओढवून घेतला आहे. दरम्यान, मोहम्मद आमिरने केलेल्या टीकेला अभिषेक शर्मा मैदानात उत्तर देईल, असा विश्वास भारतीय चाहत्यांकडून व्यक्त केला जात आहे.
एका पाकिस्तानी टीव्ही शोमध्ये बोलताना मोहम्मद आमिरने म्हणाला की, अभिषेक शर्मा हा काही मोठा फलंदाज नाही, तो फक्त एक स्लॉगर आहे. तो प्रत्येक चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न करतो. बॅट चेंडूला लागला तर ठीक नाही तर, तो बाद होतो. त्याच्याकडे फलंदाजीची कोणतीही टेकनीक्स नाही. अभिषेकला बाद करणे खूप सोपे आहे. एक फिल्डर डीप कव्हरमध्ये ठेवा आणि त्याच्या शरीराच्या दिशेने गोलंदाजी करा किंवा स्लोअर बॉल टाका, तो लगेच बाद होईल. तो ८ डावांपैकी केवळ एका डावात खेळतो, बाकी डावांत तो १०-२० धावांवर बाद होतो."
दुसरीकडे, अभिषेक शर्मा आयसीसी टी-२० क्रमवारीत जगातील नंबर १ फलंदाज आहे. केवळ आठ सामन्यांत एक मोठी खेळी करून कोणीही अव्वल स्थानी पोहोचू शकत नाही, याचा विसर कदाचित आमिरला पडला असावा, असे भारतीय चाहते म्हणत आहेत. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात अभिषेक शर्मा मोठी खेळी करून दाखवेल, अशी अपेक्षा केली जात आहे.
भारत- पाकिस्तान हेड टू हेड रेकॉर्ड
भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत एकूण १६ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले गेले आहेत. यातील १३ सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. तर, पाकिस्तानच्या संघाने तीन सामने जिंकले आहेत. टी-२० विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान आतापर्यंत आठ वेळा एकमेकांच्या आमने-सामने आले आहेत, यातील सात सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चाखली आहे. तर, एका सामन्यात पराभव स्वीकारला आहे.