Join us  

India vs Pakistan: पाकिस्तानचा शोएब अख्तर भारतीय संघाबद्दल बरळला, नक्की काय म्हणाला... वाचा सविस्तर

पाकिस्तानचे खेळाडू नेहमीच भारताबद्दल विविध विधानं केल्याने चर्चेत असतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 1:03 PM

Open in App

IND vs PAK: भारतीय संघाचा पाकिस्तानी संघाने T20 World Cup 2021 मध्ये केलेला पराभव प्रत्येक भारतीयाला अजूनही बोचतो. भारताने तब्बल १२ वेळा पाकिस्तानच्या संघाला वर्ल्ड कपमध्ये पराभूत केले होते. पण पाकिस्तानने १२ वेळचा बदला एकाच सामन्यात घेतला. भारतीय संघाच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेत पाकिस्तानने दहाच्या दहा गडी राखून सामना जिंकला. पाकिस्तानच्या या विजयानंतर पाकिस्तानचे आजी माजी क्रिकेटपटू भलतेच खुश झाले. अनेकांनी वादग्रस्त वक्तव्येदेखील केली. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने भारतीय संघाच्या चुकांचा मोठा पाढा वाचला. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्याने भारतीय संघासंबंधी एक दर्पोक्ती केली आहे.

ICC ने काही दिवसांपूर्वीच T20 World Cup 2022 चे वेळापत्रक जाहीर केले. यंदाचा वर्ल्ड कर ऑस्ट्रेलियामध्ये खेळवला जाणार आहे. या विश्वचषकातील भारताचा सलामीचा सामना पुन्हा एकदा पाकिस्तानशीच होणार आहे. २३ ऑक्टोबरला मेलबर्नच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तान हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी खेळणार आहेत. याच सामन्याबद्दल शोएब अख्तरने एक मोठं विधान केलं आहे. 'पाकिस्तानचा संघ हा सध्याच्या घडीला भारतीय संघापेक्षा जास्त चांगला आणि सक्षम आहे. त्यामुळे यंदाच्या विश्वचषकात मेलबर्नच्या मैदानावर पाकिस्तान पुन्हा एकदा भारताला पराभूत करेल', अशी दर्पोक्ती शोएब अख्तरने केली.

India vs Pakistan - T20 World Cup 2021 मध्ये काय घडलं?

भारतीय संघाला या सामन्यात प्रथम फलंदाजीची संधी मिळाली होती. पण पाकिस्तानच्या शाहीन शाह आफ्रिदीने भारताचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात बाद केले. रोहित शर्मा पहिल्याच चेंडूवर शून्यावर तर केएल राहुल ३ धावांवर माघारी परतला. सूर्यकुमार यादवही ११ धावांवर बाद झाला. त्यानंतर विराट कोहली आणि ऋषभ पंत या जोडीने संघाला काही अंशी सावरलं. पंत ३९ धावा काढून तंबूत परतला. विराटने मात्र अर्धशतक ठोकलं. त्याने ५७ धावा केल्या. त्याची एकाकी झुंजही शाहीन शाह आफ्रिदीनेच संपवली. त्यामुळे भारताला २० षटकांमध्ये ७ बाद १५१ धावाच करता आल्या. १५२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या सलामीवीरांनी संघाला विजय मिळवून दिला. मोहम्मद रिझवानने नाबाद ७९ तर कर्णधार बाबर आझमने नाबाद ६८ धावा करत संघाला दणदणीत विजय मिळवून दिला.

टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तानशोएब अख्तरभारतीय क्रिकेट संघविराट कोहली
Open in App