२०२६ च्या टी२० विश्वचषक स्पर्धेचा थरार आता अंतिम टप्प्यात आला असून, क्रिकेट जगतात उत्साहाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाचा माजी विश्वविजेता कर्णधार मायकेल क्लार्क याने एक मोठे विधान केले आहे. फायनलमध्ये सामनावीराचा पुरस्कार कोणता खेळाडू जिंकेल? याबाबत क्लार्कने भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. महत्त्वाचे म्हणजे, क्रिकेटच्या नियमानुसार, सामनावीराचा पुरस्कार हा विजयी संघातील खेळाडूलाच दिला जातो.
क्लार्कने फिल ॲलन किंवा अभिषेक शर्मा यांसारख्या आक्रमक फलंदाजांना सोडून बुमराहची निवड केली आहे. बुमराहबद्दल बोलताना क्लार्क म्हणाला की, "बुमराहकडे गोलंदाजीचे अनेक पर्याय आणि वैविध्य आहे, पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे दबावाखाली सर्वोत्तम कामगिरी करण्याची त्याची क्षमता त्याला जगातील इतरांपेक्षा वेगळे ठरवते. तो भारतासाठी 'एक्स फॅक्टर' आहे. जर त्याने अंतिम सामन्यात सामनावीराचा पुरस्कार पटकावला, तर मला मुळीच आश्चर्य वाटणार नाही."
चालू विश्वचषक स्पर्धेतही बुमराहने आपल्या धारदार गोलंदाजीने फलंदाजांना सळो की पळो करून सोडले आहे. त्याने सात सामन्या १० विकेट्स घेतल्या आहेत. तर, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३/१५ ही त्याची या स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. वानखेडे स्टेडियमवर इंग्लंडविरुद्धच्या कठीण सामन्यात १/३३ असा स्पेल टाकल्यानंतर बुमराहचा आत्मविश्वास उंचावला आहे. आता अंतिम सामन्यात भारत विरुद्ध न्यूझीलंड असा सामना रंगणार असून, बुमराह आपल्या धमाकेदार कामगिरीच्या जोरावर भारताला विजेतेपद मिळवून देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.