भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होण्याआधी या द्विपक्षीय मालिकेतील विजेत्याला दिलेल्या ट्रॉफीच्या नावात बदल करण्याचा निर्णय इंग्लंड अँण्ड वेल्स क्रिकेट बोर्डाने घेतला. २००७ पासून सुरु असलेली पतौडी ट्रॉफीला आता तेंडुलकर-अँडरसन यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर लिटल मास्टर सुनील गावसकर यांनीही आक्षेप नोंदवला होता. एवढेच नाही तर क्रिकेटचा देव आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही भारत-इंग्लंड यांच्यातील द्विपक्षीय मालिकेत पतौडी घराण्याचा वारसा जपला जावा, अशी विनंती इंग्लंड अँण्ड वेल्स क्रिकेट बोर्डाकडे केली होती.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अखेर तोडगा निघाला
पतौडी कुटुंबियाचे क्रिकेटमधील योगदान लक्षात घेऊन अखेर या घराण्याचा वारसा जपण्यासाठी ECB आणि BCCI नं तोडगा काढला आहे. बीसीसीआयशी संबंधित एका अधिकाऱ्याने यासंदर्भातील खुलासाही केला आहे. जाणून घेऊयात तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसाठी रंगणाऱ्या स्पर्धेत कसा जपला जाणार पतौडी घराण्याचा वारसा यासंदर्भातील खास स्टोरी
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
सचिनची विनंती अन् आता असा जपला जाणार पतौडी घराण्याचा वारसा
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार,ज्यावेळी या ट्रॉफीचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला त्यावेळी सचिन तेंडुलकरनं ECB शी संपर्क साधला. भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेच्या माध्यमातून पतौडी घराण्याचा वारसा जपला गेला पाहिजे, अशी विनंती त्याने इंग्लंड अँण्ड वेल्स क्रिकेट बोर्डाला केली. यात आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांचीही भूमिका होती. ही विनंती मान्य करण्यात आली असून मालिका विजेत्या कर्णधाराला पतौडी पदक देण्यात येणार आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्येच केली जाणार होती घोषणा, पण...
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील फायनलच्या वेळीच याची घोषणा करण्यात येणार होती. पण अहमदाबाद येथील विमान अपघातामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलला. आता लीड्सच्या मैदानात रंगणाऱ्या सामन्याच्या एक दिवस आधी म्हणजे १९ जून रोजी ट्रॉफीचे नाव बदलण्यात आल्याची औपचारिक घोषणा करण्यात येणार आहे.
भारत-इंग्लंड मालिका अन् दिग्गज क्रिकेटर्सच्या नावामागचा इतिहास
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सचिन तेंडुलकर हा आघाडीवर आहे. दुसऱ्या बाजूला इंग्लंडच्या माजी गोलंदाज जेम्स अँडरसन हा कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारा जलदगती गोलंदाज आहे. भारत-इंग्लंड यांच्यातील द्विपक्षीय मालिकेतील विजेत्याला दिली जाणारी ट्रॉफी आता या दोन दिग्गजांच्या नावाने दिली जाणार आहे. या दिग्गजांप्रमाणेच पतौडी कुटुंबियाचे भारत-इंग्लंडशी एक खास नातं आहे. इफ्तिखार अली खान पतौडी हे भारत आणि इंग्लंड या दोन्ही देशांकडून क्रिकेट खेळले आहेत. २००७ पासून दोन्ही देशांतील कसोटी मालिका ही पतौडी यांच्या नावाने ओळखली जात होती. आता ट्रॉफीचे नाव बदलले असले तरी पतौडी पदकासह या दिग्गजाचा वारसाही जपला जाईल.