Jasprit Bumrah likely to miss the 2nd Test Vs England : भारतीय संघातील प्रमुख जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह याला इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातच विश्रांती दिली जाऊ शकते, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगत आहे. भारत-इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टनच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. लीड्स येथील हेडिंग्लेच्या मैदानातील पहिला कसोटी सामना २४ जुनला संपला होता. त्यानंतर दुसरा सामना बुधवारी २ जुलै रोजी खेळवण्यात येणार आहे. दोन्ही सामन्यात आठवड्याभराचे अंतर असल्यामुळे जसप्रीत बुमराह पुढच्या सामन्यात खेळेल, अशी अपेक्षा होती. पण सध्याच्या घडीला जी चर्चा रंगतीये, त्यानुसार त्याच्या जागी नवा प्रयोग पाहायला मिळू शकतो, असे चित्र निर्माण झाले आहे. पहिल्या कसोटी सामन्यानंतर नवा कर्णधार शुबमन गिलनंही बुमराहला खेळवाचं की नाही त्यासंदर्भातील निर्णय हा मॅचच्या दिवशी घेतला जाईल, असे म्हटले होते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पहिल्या डावात 'पंजा', दुसऱ्या डावात पाटी राहिली कोरी
जसप्रीत बुमराह हा दुखापतीतून सावरुन संघात परतला असून वर्कलोड मॅनेजमेंटच्या पार्श्वभूमीवर पाच कसोटी सामन्यातील फक्त ३ सामन्यातच तो खेळताना दिसणार आहे. उर्वरित चार सामन्यातील कोणत्या २ सामन्यात तो खेळणार ही चर्चा रंगत असताना दुसऱ्या सामन्यात त्याला विश्रांती देण्याचा विचार सुरु असल्याचे बोलले जात आहे. तो तिसऱ्या सामन्यात पुन्हा मैदानात उतरेल, असेही वृत्त समोर येत आहे. इंग्लंड विरुद्धच्या हेडिंग्लेच्या मैदानातील पहिल्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहनं २४.४ षटके गोलंदाजी केली होती. यात पहिल्या डावात पाच विकेट्स सोडल्या तर दुसऱ्या डावात त्याची पाटी कोरीच राहिल्याचे पाहायला मिळाले.
टीम इंडियाविरुद्ध इंग्लंडची नवी चाल! ४ वर्षांपासून संघाबाहेर असलेल्या जोफ्रा आर्चरवर लावला डाव
बुमराहच्या जागी कुणाला मिळणार संधी?
जसप्रीत बुमराहच्या जागी परफेक्ट रिप्लेसमेंटचा विचार झाला तर अर्शदीप सिंगला संधी मिळू शकते. याशिवाय कुलदीप यादवचा विचारही केला जाऊ शकतो. हेडिंग्लेच्या पहिल्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह सोडला तर अन्य कोणत्याही जलदगती गोलंदाजाला आपली छाप सोडता आली नाही. प्रसिद्ध कृष्णाच्या खात्यात विकेट्स दिसत असल्या तरी त्याने धावा खूप खर्च केल्या. ज्यामुळे इंग्लंडच्या बॅटरवरील दबाव कमी झाला. मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूरही अपेक्षित कामगिरी करु शकलेले नाहीत. भारतीय संघाने आपल्या फिरकीच्या ताकदीवर मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला तर अर्शदीपसह कुलदीपसाठीही प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळू शकते. या परिस्थितीत प्रसिद्ध कृष्णाचा पत्ता कट होऊ शकतो.