Join us

भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?

अधिकृतरित्या शेवटी काय निर्णय घेण्यात येणार ते पाहण्याजोगे असेल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 13:22 IST

Open in App

England Test Series Renaming Of The Pataudi Trophy To Tendulkar Anderson Name Controversy :  भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिके आधी नव्या वादाला तोंड फुटले आहे. २००७ पासून आतापर्यंत जी द्विपक्षीय मालिका पतौडी ट्रॉफी अंतर्गत खेळवली जात होती ती आता तेंडुलकर-अँडरसन यांच्या नावाने खेळवली जाणार आहे. इंग्लंड अँण्ड वेल्स बोर्डाचा हा निर्णय अनेकांना खटकला आहे. अधिकृतरित्या यावर शिक्कामोर्तब होण्याआधी या निर्णयावर उलट सुलट चर्चा रंगू लागली आहे. भारताचे माजी कसोटीपटू आणि कर्णधार सुनील गावसकर यांनी देखील हा निर्णय असंवेदनशील असल्याचे मत व्यक्त केले आहे. हा वाद मिटवण्यासाठी इंग्लंड वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) आणि बीसीसीआयने मिळून तोडगा काढल्याची गोष्ट समोर येत आहे. जाणून घेऊयात त्यासंदर्भातील सविस्तर माहिती

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

तेंडुलकर-अँडरसन यांना सन्मान देताना असा जपला जाणार पतौडींचा वारसा

रेव स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून या द्विपक्षीय मालिकेला दिलेले पतौडी कुटुंबियांचे नाव न हटवता ते कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. फक्त मालिकेतील विजेत्या संघाला दिल्या जाणाऱ्या ट्रॉफीला तेंडुलकर-अँडरसन यांचे नाव देण्यात येईल. यामुळे द्विपक्षीय मालिकेचं ऐतिहासिक महत्त्व कायम राहिल आणि आधुनिक काळातील दोन दिग्गजांचे नावही या मालिकेशी जोडले जाईल, असा विचार करण्यात आलाय. अधिकृतरित्या शेवटी काय निर्णय घेण्यात येणार ते पाहण्याजोगे असेल. 

IND vs ENG : पतौडी ट्रॉफी आता तेंडुलकर-अँडरसन नावाने ओळखली जाणार! गावसकर नाराज, कारण...

पतौडी कुटुंबिय अन् भारत-इंग्लंड क्रिकेटमधील अनोखा इतिहास

भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला २००७ मध्ये पतौडी कुटुंबियांचे नाव देण्यात आले होते. पतौडीचे नवाब इफ्तिखार अली पतौडी हा दिग्गज क्रिकेटरने भारत आणि इंग्लंड या दोन्ही देशांचे प्रतिनिधीत्व केले आहे. ते या दोन देशाचे प्रतिनिधीत्व करणारे एकमेव क्रिकेटर आहेत. मन्सूर अली पतौडी यांनी आपल्या वडिलांचा क्रिकेटचा वारसा जपला. मन्सूर आली पतौडी हे भारतीय कसोटी संघाचे यशस्वी कर्णधारांपैकी एक आहेत.

इंग्लंडच्या संघाकडून पदार्पणात शतक, भारताकडून खेळला शेवटचा कसोटी सामना

इफ्तिखार अली पतौडी यांनी इंग्लंडच्या संघाकडून पदार्पणाचा सामना खेळला होता. सिडनीच्या मैदानात रंगलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने १०२ धावांची खेळी केली होती. १९४६ मध्ये त्यांनी इंग्लंड दौऱ्यावर त्यांनी भारतीय कसोटी संघातून पदार्पण केले होते. भारताकडून खेळताना या दौऱ्यात त्यांनी ३ सामन्यातील ५ डावात फक्त ५५ धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून खेळताना ३ सामन्यात त्यांच्या नावे १४४ धावांची  नोंद आहे. मन्सूर अली  पतौडी यांनी भारताकडून ४६ सामन्यात ६ शतके आणि १६ अर्धशतकांसह २७९६ धावा केल्याचा रेकॉर्ड आहे. 

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५भारत विरुद्ध इंग्लंडसचिन तेंडुलकरजेम्स अँडरसनभारत विरूद्ध इंग्लंड २०२५बीसीसीआय