Join us

IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!

करुण नायरनं संय़मी खेळीसह पेश केला खास नजराणा नजराणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 00:57 IST

Open in App

IND vs ENG 5th Test Day 1 Stumps :  इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी करुण नायरनं  संयमी खेळीसह आपल्या फलंदाजीतील नजराणा पेश केला. त्याने नऊ वर्षांनी झळकावलेल्या नाबाद अर्धशतकासह वॉशिंग्टन सुंदरसोबत केलेल्या उपयुक्त भागीदारीच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या दिवसाअखेर ६ विकेट्सच्या मोबदल्यात २०४ धावा केल्या आहेत. पावसाच्या व्यत्ययामुळे पहिल्या दिवशी ६४ षटकांचा खेळ झाला.  हा दिवस दोन्ही संघासाठी समसमान असाच राहिला.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

दोन्ही सलामीवीर स्वस्तात फिरले माघारी

सामना जिंकून मालिका वाचवण्यासाठी ओव्हलच्या मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने अखेरच्या सामन्यातही टॉस गमावला. इंग्लंडचा नवा कर्णधार ओली पोप याने नाणेफेकीचा कौल जिंकून फायदा उचलण्याच्या इराद्याने पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. चौथ्या षटकात गस ॲटकिन्सन (Gus Atkinson) याने कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला. धावफलकावर १० धावा असताना यशस्वी जैस्वालच्या रुपात टीम इंडियाला पहिला धक्का दिला. यशस्वी २ चेंडूत ९ धावा करून तंबूत परतला. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत फॉर्ममध्ये असलेला लोकेश राहुल चुकीचा फटका खेळून क्रिस वोक्सच्या गोलंदाजीवर फसला. त्याने ४० चेंड़ूचा सामना करत १४ धावा केल्या. ३८ धावांवर टीम इंडियाचे दोन्ही सलामीवीर तंबूत परतले होते. 

Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)

साईसोबत जोडी जमली असताना शुबमन गिलनं फेकली विकेट

सलामीवर स्वस्तात माघारी फिरल्यावर साई सुदर्शन आणि शुबमन गिल यांनी संघाचा डाव सावरला. पावसाच्या व्यत्ययामुळे अंदर बाहरच्या खेळात या जोडीनं तिसऱ्या विकेटसाठी ४५ धावांची भागीदारी रचली. सेट झालेल्या शुबमन गिलनं हातातल्या चेंडूवर धाव घेण्यासाठी घाई केली अन् तो ३५ चेंडूत २१ धावा करून धावबाद होऊन परतला. 

साईनं संयम दाखवला, पण...शुबमन गिलनं मोठी चूक करत विकेट गमावल्यावर साई सुदर्शनकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण १०८ चेंडूचा सामना केल्यावर त्यानेही ३८ धावा करून तंबूचा रस्ता धरला. रवींद्र जडेजा ९ धावा करून माघारी फिरल्यावर टीम इंडिया अडचणीत सापडली होती. त्यात ध्रुव जुरेलच्या विकेटची भर पडली. १५३ धावांवर ६ विकेट्स पडल्यावर गोलंदाजीसाठी अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर भारतीय संघ २०० धावांच्या आत आटोपतोय की, काय? अस चित्र निर्माण झाले होते. 

करुण नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् मोठं संकट टळलं

संघ अडचणीत असताना करुण नायरनं ५२ (९८) याने संयमी खेळीसह आपल्या फलंदाजीतील धमक दाखवून देत अर्धशतक झळकावले. दुसऱ्या बाजूला वॉशिंग्टन १९ (४५) याने त्याला सुंदर साथ दिली. या दोघांनी सातव्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी करत पहिल्या दिवशीच दोनशे धावांच्या आत ऑल आउटचा धोका टाळला. आता दुसऱ्या दिवशी ही जोडी ही भागीदारी आणखी मोठी करुन संघाला मजबूत स्थितीत नेण्यासाठी प्रयत्नशील असतील. ओव्हलच्या मैदानात भारतीय संघाने पहिल्या डावात २५० धावांपर्यंत जरी मजल मारली तरी ती उत्तम कामगिरी ठरले. जर ३०० पारचा आकडा पार केला तर भारतीय संघाला सामन्यावर मजबूत पकड मिळवणं सहज सोपे होईल.

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५भारत विरुद्ध इंग्लंडवॉशिंग्टन सुंदर