Join us

IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ

फायनल टेस्टचा निकाल तासाभरात लागणार, पण...

By सुशांत जाधव | Updated: August 4, 2025 00:19 IST

Open in App

IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : अँडरसन तेंडुलकर ट्रॉफीसाठी भारत आणि इंग्लंड यांच्यातील ओव्हलच्या मैदानात सुरु असलेला पाचवा आणि अखेरचा सामना रंगतदार स्थितीत पोहचला आहे. इंग्लंडच्या हातात ४ विकेट्स असताना कुठली आलीये रंगत? असा प्रश्न काहींना पडू शकतो. कारण चौथ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी इंग्लंडच्या संघाने दुसऱ्या डावात ६ बाद ३३९ धावा केल्या होत्या. सामन्यासह मालिका ३-१ जिंकण्यासाठी त्यांना फक्त ३५ धावा करायच्या आहेत. दुसरीकडे भारतीय संघाला सामना जिंकून अँडरसन तेंडुलकर ट्रॉफी स्पर्धेतील मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी ४ विकेट्स घ्याव्या लागतील. आकडेवारीच्या इंग्लंडसाठी सामना सोपा वाटत असला तरी खेळपट्टीचा रंग पाहता इथं भारतीय संघाच्या चमत्कारिक विजयाचीही संधी आहे.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

फायनल टेस्टचा निकाल तासाभरात लागणार, पण...

कोण जिंकणार? या प्रश्नाच उत्तर शोधताना भारतीय चाहते मनापासून अर्थात दिल से... टीम इंडियाच असं उत्तर देतील. दुसऱ्या बाजूला दिमाग मात्र कुठंतरी इंग्लंडच्या बाजूनं कौल देईल. त्यामुळेच चौथ्या दिवसाचा खेळ हा 'दिल अन् दिमाग' यांची टेस्ट घेणाऱ्या प्रश्नासह संपलाय असं म्हणावे लागेल. ओव्हलची खेळपट्टी ही गोलंदाजांवर मेहरबान राहिलीये. सामन्याचा निकाल हा तासाभरात लागणार हे पक्के आहे. पण कोण जिंकणार याचा अंदाज लावणं कठीण आहे. 

IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत

३५ धावांत ४ विकेट्स, अशक्यप्राय वाटणारा विजय शक्य, कारण...

भारतीय संघ ३५ धावांत ४ विकेट्स घेईल एवढी खेळपट्टी गोलंदाजांना मेहरबान आहे का? या प्रश्नाच उत्तर हो आहे. यासाठी कसोटीच्या आतापर्यंतच्या इतिहासातील दाखले शोधण्याचीही गरज नाही. कारण ओव्हल कसोटी सामन्यातील चालू सामन्यातील आकडेवारीच टीम इंडियाला बळ देणारी आहे. इंग्लंडच्या मैदानात मजबूत फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने पहिल्या डावात सेट जोडी तंबूत परतल्यावर अवघ्या ६ धावांत ४ विकेट्स गमावल्या होत्या. इंग्लंडचा संघ पहिल्या डावात २१५ धावांवर सहावी विकेट गमावल्यावर २४७ धावांत ऑल आउट झाला होता. ३२ धावांत त्यांनी तळाच्या ४ विकेट्स गमावल्या होत्या. त्यामुळेच ३५ धावांचा बचाव करुन टीम इंडियाला इथं अशक्यप्राय वाटणारा सामना जिंकू शकतो.

हॅरी ब्रूक अन् जो रुटच्या शतकी खेळीमुळे टीम इंडिया अडचणीत

इंग्लंडच्या संघाने १ बाद ५० धावांवरून चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. अर्शशतकी खेळीनंतर बेन डकेट ५४ (८३) प्रसिद्ध कृष्णाच्या जाळ्यात अडकला. मोहम्मद सिराजनं ओली पोपला २७ (३४) धावांवर बाद करत इंग्लंडच्या संघाला तिसरा धक्का दिला. १०६ धावांवर इंग्लंडच्या संघाने आघाडीच्या तीन विकेट्स गमावल्या होत्या. पण त्यानंतर हॅरी ब्रूक आणि जो रूट जोडी जमली. दोघांनी चौथ्या विकेटसाठी १९५ धावांची भागीदारी रचत सामना इंग्लंडच्या बाजूनं फिरवला. हॅरी ब्रूकनं ९८ चेंडूत १४ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने १११ धावांची खेळी केली. इंग्लंडच्या धावफलकावर ३०१ धावा लागल्या असताना आकाशदीपनं हॅरी ब्रूकला चालते केले.

प्रसिद्ध कृष्णानं टेस्टमध्ये आणलं ट्विस्ट

हॅरी ब्रूक तंबूत परतल्यावर दुसऱ्या बाजूला असलेल्या जो रूटनं आपल्या कसोटी कारकिर्दीतील ३९ वे शतक पूर्ण केले. त्यामुळे सामना हा इंग्लंडच्या बाजूनेच झुकला होता. पण जेकब बेथेल ५ (११) याच्या पाठोपाठ प्रसिद्ध कृष्णानं शतकवीर जो रूटला १०५(१५२) बाद करत टेस्टमध्ये ट्विस्ट आणलं.  अंधुक प्रकाश आणि पावसामुळे चौथ्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी इंग्लंडच्या संघाने ६ विकेट्सच्या मोबदल्यात ३३९ धावा केल्या होत्या. जेमी स्मिथ २ (१७) आणि जेमी ओव्हरटन ०(८) ही जोडी मैदानात होती.

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५भारत विरुद्ध इंग्लंडमोहम्मद सिराजजो रूट