Join us  

मी बोलावलं नाही, परत जा...! रोहितच्या कृत्याने पिकला हशा; इंग्लिश खेळाडूही अवाक्, Video

IND vs ENG 3rd Test Live: सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसऱ्या कसोटी सामन्याचा थरार रंगला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2024 3:12 PM

Open in App

IND vs ENG 3rd Test Live Updates In Marathi | राजकोट: भारतीय संघाने राजकोट कसोटी सामन्यात मजबूत पकड बनवली आहे. भारताने दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वालच्या द्विशतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडसमोर ५५७ धावांचे तगडे लक्ष्य ठेवले. खरं तर डाव घोषित करताना मैदानावर एक मजेशीर घटना घडली. यजमान संघाने दुसऱ्या डावात ९८ षटके खेळली आणि त्यादरम्यान अचानक ड्रिंक्स ब्रेकच्या वेळी सर्फराज खान आणि यशस्वी जैस्वाल पॅव्हेलियनच्या दिशेने परत जाऊ लागले. तितक्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने पॅव्हेलियनमधूनच युवा खेळाडूंना मजेदार पद्धतीने फटकारले.

दरम्यान, झाले असे की यशस्वी जैस्वालचे द्विशतक झाल्यानंतर डाव घोषित केला जाईल असे अपेक्षित होते. त्यामुळे द्विशतक पूर्ण होताच ड्रिंक ब्रेक झाला, यशस्वी आणि सर्फराज यांना वाटले की, डाव घोषित झाला. ते या हेतूने पॅव्हेलियनच्या दिशेने परतले. पण रोहितने त्यांना हातवारे करत पुन्हा मैदानात जाण्यास सांगितले. हिटमॅनचे हे कृत्य पाहून सर्वांनाच हशा पिकला. इंग्लिश संघातील खेळाडू देखील अवाक् झाल्याचे दिसले. 

तिसऱ्या दिवसअखेर यजमान भारताने ३२२ धावांची मजबूत आघाडी घेतली होती, ज्यात यशस्वी द्विशतकाने आणखी भर घातली. सर्फराज खान आणि शुबमन गिल यांच्या अर्धशतकी खेळीची यशस्वीला चांगली साथ मिळाली. त्याने २३१ चेंडूत १० षटकार आणि १४ चौकारांच्या मदतीने २०० धावांचा आकडा गाठला. यशस्वी जैस्वाल २१४ आणि सर्फराज खान ६८ धावा करून नाबाद परतला. भारताने ४३० धावांवर डाव घोषित केला असून इंग्लंडला विजयासाठी ५५७ धावांची आवश्यकता आहे.

भारत मजबूत स्थितीत तिसऱ्या दिवसअखेर ५१ षटकांत २ बाद १९६ धावा करून ३२२ धावांची मजबूत आघाडी घेतली होती. शुबमन गिल (६५) आणि कुलदीप यादव (३) नाबाद परतले होते. पण, चौथ्या दिवशी गिल आपले शतक पूर्ण करेल असे अपेक्षित असताना त्याला धावबाद व्हावे लागले. आज चौथ्या दिवशी खेळपट्टीवर येण्यापूर्वी जैस्वालने ५ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने १३३ चेंडूत १०४ धावा केल्या होत्या. भारताने दुसऱ्या डावात चमकदार कामगिरी केली. रोहित शर्मा (१९) स्वस्तात बाद झाल्यानंतर यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिल यांनी मोर्चा सांभाळला. गिल १५१ चेंडूत ९१ धावा करून धावबाद झाला. पण यशस्वीने आपला अप्रतिम खेळ सुरूच ठेवला अन् वैयक्तिक द्विशतकासह भारताला मजबूत आघाडी मिळवून दिली.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडयशस्वी जैस्वालसर्फराज खानरोहित शर्मासोशल व्हायरल