नवी दिल्ली : आगामी चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत जर भारतीय संघ जिंकला तर त्यात पूर्णपणे फिट जसप्रीत बुमराहची भूमिका महत्त्वाची ठरेल, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार ॲलन बॉर्डरने व्यक्त केले. स्वत:ला बुमराहचा प्रशंसक असल्याचे सांगत बॉर्डर म्हणाला भारताच्या या प्रमुख वेगवान गोलंदाजामध्ये उभय संघांदरम्यान फरक स्पष्ट करण्याची क्षमता आहे. मालिकेला गुरुवारपासून ॲडिलेडमध्ये सुरुवात होणार आहे.
बॉर्डर म्हणाला,‘बुमराह सामना जिंकवून देणार खेळाडू आहे. मी त्याच्याबाबत चिंतित आहे. आमच्या खेळपट्ट्यांवर थोडी उसळी व मुव्हमेंट मिळते. त्याने जर गेल्यावेळी प्रमाणे गोलंदाजी केली आणि महत्त्वाचे बळी घेतले तर तर तो अंतर स्पष्ट करू शकतो.’
बुमराहने २०१८-१९ मध्ये चार सामन्यांच्या मालिकेत २१ बळी घेतले होते. त्यावेळी भारताने ऑस्ट्रेलियात प्रथमच कसोटी मालिका जिंकली होती. त्यात बुमराहची भूमिका महत्त्वाची ठरली होती.
बॉर्डर म्हणाला,‘तुम्ही नेहमी म्हणता की फलंदाजांनी पुरेशा धावा केल्या, पण कसोटी सामना जिंकण्यासाठी २० बळी घेण्याची गरज असते. जर बुमराह फिट असेल तर तो महत्त्वाचा ठरू शकतो. तो भेदक मारा करण्यास सक्षम आहे. तो क्रिकेटचा पूर्ण आनंद घेतो. त्याच्या चेहऱ्यावर हास्य असते. ज्यावेळी तो फॉर्मात असतो त्यावेळी त्याला खेळणे कठीण असते.’