ठळक मुद्देभारतीय संघाने 7 बाद 443 धावांवर पहिला डाव घोषित केला. संजय मांजरेकर यांना कोहलीचा हा निर्णय पटला नाहीरोहित शर्मा खेळपट्टीवर असताना भारत 50-75 धावा करू शकला असता
मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाने मेलबर्न कसोटीच्या दुसऱ्या दिवशी 7 बाद 443 धावांवर पहिला डाव घोषित केला. भारताने पहिल्या दिवशी 2 बाद 215 धावा केल्या होत्या. मात्र, दुसऱ्या दिवशी अखेरच्या सत्रात रवींद्र जडेजाची (4) विकेट पडताच कर्णधार विराट कोहलीने डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी दुसऱ्या एंडला रोहित शर्मा 63 धावांवर खेळत होता.
माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांना कोहलीच्या डाव घोषित करण्याच्या निर्णयावर टीका केली. रोहित शर्मा मैदानावर होता आणि भारत 50-75 धावा अधिक करू शकला असता. दुसऱ्या डावात रोहितला अशी खेळी करणे सोपं जाणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.
मांजरेकर यांनी ट्विट केले की,''भारताचा डाव घोषित करण्याचा निर्णय आश्चर्यात टाकणारा आहे. रोहित नाबाद होता आणि भारताला त्याने आणखी 50-75 धावा करून दिल्या असत्या. दुसऱ्या डावात फलंदाजी करणे सोपी गोष्ट नसेल. त्यामुळे पहिल्याच डावात या धावा जोडणे योग्य ठरले असते''
मांजरेकर यांच्या ट्विटवर नेटिझन्सने चांगलीच टीका केली. भारताने रोहितला तिहेरी शतक झळकावण्याची संधी द्यावी का, असा प्रश्न नेटिझन्सनी मांजरेकरांना केला.
भारताच्या पहिल्या डावातील 7 बाद 443 धावांच्या उत्तरात ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवसअखेर बिनबाद 8 धावा केल्या आहेत. भारतासाठी चेतेश्वर पुजाराने सर्वाधिक 106 धावा केल्या आहे. कोहलीने 82, मयांक अग्रवालने 76 आणि रोहितने नाबाद 63 धावा केल्या.