ठळक मुद्देभारताच्या पहिल्या डावातील 443 धावांचा पाठलाग करताना यजमान ऑस्ट्रेलियाची तारांबळ उडाली आहे.ऑस्ट्रेलियाचे सहा फलंदाज 102 धावांवर माघारी, फॉलोऑनचे सावटरवींद्र जडेजाच्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध पन्नास विकेट
मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताच्या पहिल्या डावातील 443 धावांचा पाठलाग करताना यजमान ऑस्ट्रेलियाची तारांबळ उडाली आहे. त्यांच्यावर फॉलोऑनचे सावट घोंगावू लागले आहेत. त्यांचे सहा फलंदाज अवघ्या 102 धावांवर माघारी परतले आहेत. या सामन्यात जसप्रीत बुमरा आपल्या वैविध्यपूर्ण गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधत आहे. त्यात रवींद्र जडेजाने सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाविरुद्ध बळींचे अर्धशतक पूर्ण केले.
चेतेश्वर पुजारा (106) आणि कर्णधार विराट कोहली (82) यांनी उभ्या केलेल्या डोलाऱ्याच्य जोरावर भारताने पहिल्या डावात 7 बाद 443 धावांचा डोंगर उभा केला. कसोटीत कमबॅक करणाऱ्या रोहित शर्माने (63*) अर्धशतकी खेळी करून चाहत्यांना खूश केले. 7 बाद 443 धावांवर कोहलीने भारताचा डाव घोषित केला. दुसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने बिनबाद 8 धावा केल्या होत्या. मात्र, तिसऱ्या दिवसाचे पहिले सत्र भारतीय गोलंदाजांनी गाजवले. त्यांनी जशासतशी गोलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना शरणागती पत्करण्यास भाग पाडले.
इशांत शर्माने भारताला पहिले यश मिळवून दिले. त्याने अॅरोन फिचला माघारी पाठवले. त्यानंतर बुमरा आणि जडेजा यांनी अनुक्रमे ट्रॅव्हिस हेड आणि उस्मान ख्वाजाचा अडथळा दूर केला. ही जोडी भारतासाठी डोकेदुखी ठरेल असे वाटत होते, परंतु त्यांना वेळीच माघारी पाठवण्यात गोलंदाजांना यश आले. जडेजाने ख्वाजाची विकेट घेत एक पराक्रम केला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही त्याची 50 वी विकेट ठरली. त्यात त्याने आणखी एका विकेटची भर घातली. त्याने मिचेल मार्शलाही बाद केले. तंदुरुस्तीचे कारण देऊन जडेजाला दुसऱ्या कसोटीत बाकावर बसवण्यात आले होते. त्यावरून प्रचंड टीकेचा मारा झाला. पण, मेलबर्न कसोटीत त्याला सहभागी करण्यात आले आणि त्याने निवड सार्थ ठरवली.
![]()