ठळक मुद्देचेतेश्वर पुजाराची शतकी खेळी280 चेंडूंत पूर्ण केले शतककसोटी कारकिर्दीतले 17वे शतक
मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : चेतेश्वर पुजारा हा परफेक्ट कसोटी फलंदाज आहे. कसोटी क्रिकेटसाठी लागणारा संयम, लागणारी एकाग्रता आणि मानसिक कणखरता ही त्याच्यात भरपूर आहे. बॉक्सिंग डे कसोटीत प्रंचड तणाव असताना शतक झळकावून पुजाराने त्याची उपयुक्तता सिद्ध केली. ऑस्ट्रेलिया मालिकेतील हे त्याचे दुसरे, तर कारकिर्दीतील 17 वे कसोटी शतक ठरले. पण याआधीच्या 16 शतकांपेक्षा हे शतक खास आहे.
मयांक अग्रवालच्या दमदार खेळीनंतर पुजाराने कर्णधार विराट कोहलीने भारतीय संघाची घोडदौड सुरू ठेवली. पहिल्या दिवसात भारताने केवळ दोनच गडी गमावत 215 धावा केल्या होत्या. पुजारा 68 आणि कोहली 47 धावांवर खेळत होते. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्राच्या सुरुवातीला कोहलीने आपले अर्धशतक पूर्ण केले आणि उत्सुकता लागली ती पुजाराच्या शतकाची.
पुजाराने 280 चेंडूत कारकिर्दीतील 17 वे शतक पूर्ण केले. बॉक्सिंग डे कसोटीत मेलबर्नवर शतक झळकावणारा तो पाचवा भारतीय फलंदाज ठरला. याआधी सचिन तेंडुलकर (116 धावा 1999), वीरेंद्र सेहवाग ( 195 धावा 2003), विराट कोहली ( 169 धावा 2014), अजिंक्य रहाणे ( 147 धावा 2014) यांनी ही कामगिरी केली आहे.
तरीही एका वेगळ्या कारणाने हे वेगळे ठरत आहे. पुजाराने या शतकासाठी 280 चेंडू खेळले. त्याने कारकिर्दीत प्रथमच शतक झळकावण्यासाठी 250 हून अधिक चेंडू खेळले. म्हणजे त्याचे हे सर्वात संथ शतक ठरले. मागील 15 वर्षांत केवळ कोहलीने ( वि. इंग्लंड 2012) शतकासाठी 289 चेंडू खेळली आहेत. त्यानंतर संथ शतक करण्याचा भारतीय खेळाडूचा विक्रम पुजाराच्या नावावर नोंदवला गेला.
पुजाराचे हे परदेशातील 7 वे शतक आहे. त्याने सहा विविध स्टेडियमवर शतक झळकावली आहेत. कोलंबोवर त्याने दोन, तर जोहान्सबर्ग, गाले, साउदॅम्प्टन, ॲडलेड आणि मेलबर्न येथे प्रत्येकी एक शतक झळकावले आहे.