Join us  

ICC World Cup 2019 : भारत-ऑस्ट्रेलिया सामना पाहणाऱ्या माल्ल्यावर चाहते भडकतात तेव्हा...

भारताचे पैसे कधी परत कळणार, असे म्हणत चाहत्यांनी माल्ल्याला चांगलेच धारेवर धरले.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 6:38 PM

Open in App

ओव्हल, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना रविवारी खेळवण्यात आला. हा सामना पाहण्यासाठी भारतीय बँकांचे नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून परदेशात फरार झालेल्या मद्यसम्राट विजय माल्ल्याने सुद्धा हजेरी लावली होती. त्या़वेळी भारतीय चाहते माल्ल्यावर चांगलेच भडकल्याचे पाहायला मिळाले. माल्ल्या हा भारतातील गुंड आहे. भारताचे पैसे कधी परत कळणार, असे म्हणत चाहत्यांनी माल्ल्याला चांगलेच धारेवर धरले.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना पाहण्यासाठी जात असतानाचे विजय माल्ल्याचे फोटो एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विटरवर पोस्ट केले आहेत. यावेळी, मी सामना पाहण्यासाठी आलो आहे, असे सांगत कोणतीही प्रतिक्रिया देण्यास  विजय माल्ल्याने नकार दिला.

भारताचे ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजयाचे अर्धशतकवर्ल्ड कप स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वोत्तम कामगिरीची नोंद करणाऱ्या भारतीय संघाने रविवारी विजय मिळवला. भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात धावांचा पाऊस पाहायला मिळेल, याची सर्वांना खात्री होती. पण, नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूनं लागल्यानं विराट कोहलीची बाजू वरचढ ठरली. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 352 धावांचा डोंगर उभा केला.

ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी हळुहळू का होईना हा डोंगर सर करण्याच्या दृष्टीनं पाऊल टाकले होते, परंतु भारतीय गोलंदाजांनी कामगिरीचा आलेख उंचावत त्यांना रोखले. भारताने 36 धावांनी हा सामना जिंकला आणि ऑस्ट्रेलियाची सलग दहा सामन्यांतील अपराजीत मालिका खंडित झाली. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 316 धावांत तंबूत परतला. भारताचा हा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा 50वा विजय ठरला. उभय संघांमध्ये आतापर्यंत झालेल्या 137 सामन्यांत ऑस्ट्रेलियाने 77 विजय मिळवले आहेत.

भारत आणि ऑस्ट्रेलिया हा सामना म्हटलं की त्यात टशन, डिवचणं आलंच, परंतु आज असे काहीच घडलं नाही. फलंदाजांना पोषक असलेल्या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकून कर्णधार विराट कोहलीनं फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी ऑसी गोलंदाजांची धुलाई करताना भारतासाठी मजबूत पाया रचला. त्यानंतर कर्णधार कोहली आणि हार्दिक पांड्या यांनी दमदार खेळ करत भारतीय संघाला 5 बाद 352 धावांपर्यंत मजल मारून दिली. भारताची ही वर्ल्ड कप स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाविरुद्धची सर्वोत्तम कामगिरी ठरली. यापूर्वी भारतने 1987साली दिल्लीत 6 बाद 289 धावा केल्या होत्या. तसेच वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोणत्याही संघानं केलेली ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.  लक्ष्याचा पाठलाग करताना अॅरोन फिंच आणि डेव्हिड वॉर्नर यांनी सावध खेळावर भर दिला. भारतीय गोलंदाजांनीही टिच्चून मारा करताना ऑस्ट्रेलियाच्या धावांना लगाम लावला होता. दहाव्या षटकात या दोघांनी फटकेबाजीला सुरुवात केली. पण, 14व्या षटकात समन्वयाच्या अभावापायी ही जोडी तुटली. वॉर्नरनं दुसऱ्या धावेची हाक दिली आणि संभ्रमात असलेला फिंच जरा उशीरा धावला. त्यामुळे त्याला धावबाद होऊन माघारी परतावे लागले. त्यानंतर वॉर्नर आणि स्टीव्हन स्मिथ या अनुभवी जोडीनं 72 धावांची भागीदारी केली. दरम्यान वॉर्नरने वन डे क्रिकेटमधील त्याचे सर्वात संथ अर्धशतक पूर्ण केले. युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या नादात वॉर्नर झेलबाद झाला. स्मिथनं एका बाजूंन खिंड लढवताना उस्मान ख्वाजासह अर्धशतकी भागीदारी केली.

टॅग्स :विजय मल्ल्यावर्ल्ड कप 2019भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया