Join us  

ICC World Cup 2019 : पाकचा उपांत्य फेरीतील प्रवेशाचा 'रिमोट कंट्रोल' टीम इंडियाच्या हातात, जाणून घ्या कसा?

ICC World Cup 2019 : पाकिस्तानचा वर्ल्ड कप स्पर्धेतील प्रवास 1992च्या स्पर्धेप्रमाणे सुरू आहे. बुधवारी त्यांनी न्यूझीलंडला नमवून उपांत्य फेरीच्या आशा जीवंत ठेवल्या आहेत. उर्वरित लढतीत त्यांना अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांचा सामना करायचा आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 10:48 AM

Open in App

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : पाकिस्तानचा वर्ल्ड कप स्पर्धेतील प्रवास 1992च्या स्पर्धेप्रमाणे सुरू आहे. बुधवारी त्यांनी न्यूझीलंडला नमवून उपांत्य फेरीच्या आशा जीवंत ठेवल्या आहेत. उर्वरित लढतीत त्यांना अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांचा सामना करायचा आहे. सध्याचा फॉर्म पाहता ते या लढतीत विजय मिळवतील अशी सर्वांनाच अपेक्षा आहे. पण, त्यांचा उपांत्य फेरीतील प्रवेशाचा रिमोट कंट्रोल भारतीय संघाच्या हातात आहे. त्यामुळे शेवटी सख्ख्या शेजाऱ्यांकडूनच पाकला मदत मागावी लागणार आहे.

पाकिस्तानने बुधवारी झालेल्या सामन्यात स्पर्धेत अपराजित असलेल्या न्यूझीलंडला पराभवाची चव चाखवली. गोलंदाजांचा अचूक मारा आणि फलंदाजांची साजेशी साथ याच्या जोरावर पाकने हा सामना 6 विकेट राखून जिंकला. शाहिन आफ्रिदीनं 3 महत्त्वाच्या विकेट्स घेत किवींना धक्का दिला, परंतु जिमी निशॅम ( 97*), कॉलिन  डी ग्रँडहोम ( 64) आणि कर्णधार केन विलियम्सन ( 41) यांनी संघाला 237 धावांचा पल्ला गाठून दिला. माफक लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात बाद झाले. पण, बाबर आझम ( 101*) आणि हॅरिस सोहेल ( 68) यांनी दमदार खेळ करून संघाला विजय मिळवून दिला.

सध्याच्या गुणतक्त्यानुसार ऑस्ट्रेलियानं उपांत्य फेरीत आपले स्थान पक्कं केलं आहे. न्यूझीलंड 11 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे आणि त्यांचे दोन सामने शिल्लक आहेत. भारताचे सर्वाधिक चार सामने शिल्लक आहेत आणि ते 9 गुणांसह तिसऱ्या, तर यजमान इंग्लंड 7 सामन्यांत 8 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. पाकिस्तानने बुधवारी न्यूझीलंडला नमवून 7 सात सामन्यांत 7 गुणांसह सहाव्या स्थानी आगेकूच केली आहे. पण, त्यांना इंग्लंडच्या निकालावरही अवलंबून राहावे लागणार आहे. इंग्लंडचा पुढील सामना भारताविरुद्ध होणार आहे आणि त्यात भारताने विजय मिळवल्यास पाकिस्तानच्या मार्गातील मोठा अडथळा दूर होऊ शकतो.

अशात भारतीय संघ पराभूत झाल्यास पाकिस्तानला मग न्यूझीलंड - इंग्लंड या लढतीकडे डोळे लावून बसावे लागेल. शिवाय भारतीय संघ बांगलादेश व श्रीलंका या संघांविरुद्धही खेळणार आहे. पाकिस्तानला उपांत्य फेरीच्या स्पर्धेबाहेर फेकण्याचा निर्णय झालाच असेल तर भारतीय संघ या लढतींत पराभव पत्करून पाकिस्तानची गोची करू शकतो. कारण बांगलादेशचेही 7 सामन्यांत 7 गुण आहेत आणि त्यांनाही उर्वरित दोन सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची संधी आहे. श्रीलंकाही 6 सामन्यांत 6 गुणांसह उपांत्य फेरीच्या शर्यतीत आहे. त्यामुळे या इंग्लंडसह बांगलादेश व श्रीलंका यांच्याविरुद्धही भारताने विजय मिळवावा यासाठी पाकिस्तानचे चाहते प्रार्थना करत आहेत.

 

 

टॅग्स :वर्ल्ड कप 2019भारतपाकिस्तान