भारतात यावर्षी आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक खेळला जाणार आहे. या स्पर्धेसाठी पाकिस्तानमध्ये पात्रता सामने खेळवण्यात आले, ज्यात एकूण सहा संघांनी भाग घेतला. शनिवारी खेळल्या गेलेल्या शेवटच्या पात्रता सामन्यात वेस्ट इंडिजला विजयासाठी १६७ धावांचे लक्ष्य मिळाले. विश्वचषकाचे तिकीट मिळवण्यासाठी वेस्टइंडीजला अवघ्या १०.१ षटकातच लक्ष्य गाठायचे होते. परंतु, वेस्टइंडीजचा संघ अपयशी ठरला आणि अवघ्या चार चेंडूमुळे त्यांना विश्वचषकातून बाहेर पडावे लागले.
वेस्ट इंडिजचा संघ २०२५ च्या क्रिकेट विश्वचषकासाठी पात्रतेच्या उंबरठ्यावर होता. पहिले समीकरण असे होते की, वेस्ट इंडिजच्या संघाने थायलंडने दिलेले १६७ धावांचे लक्ष्य १० षटके किंवा त्याआधीच गाठले तर ते रनरेटने बांगलादेशला मागे टाकून विश्वचषकाचे तिकीट मिळवतील. दुसरे समीकरण असे होते की, वेस्टइंडीजने १०.५ षटकात १६६ धावा केल्या आणि पुढच्या चेंडूवर षटकार मारला असता तरीही ते विश्वचषकासाठी पात्र ठरले असते. परंतु, विश्वचषक खेळणे वेस्टइंडीजच्या नशिबात नव्हते, असे बोलणे वावगे ठरणार नाही.
वेस्ट इंडिजच्या महिला क्रिकेट संघाने १६७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऐतिहासिक विजय मिळवला. कर्णधार हेली मॅथ्यूजने २९ चेंडूत जलद ७० धावा केल्या, तर चिनली हेन्रीने १७ चेंडूत ४८ धावा केल्या. संघाने हा सामना फक्त १०.५ षटकांत जिंकला, पण त्यांनी हा सामना पाच चेंडू आधीच जिंकला असता आज त्यांचे नाव बांगलादेशऐवजी विश्वचषक खेळणाऱ्या संघांमध्ये समाविष्ट झाले असते. या पराभवामुळे दुःखी झालेल्या वेस्ट इंडिजच्या महिला क्रिकेटपटूंना त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि त्या मैदानावर रडू लागल्या.
भारत (यजमान), ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका (टॉप ५ संघ), बांगलादेश आणि पाकिस्तान (क्वालिफायरमध्ये जिंकणारे २ संघ). ही स्पर्धा २९ सप्टेंबर ते २६ ऑक्टोबर दरम्यान भारतात खेळवली जाईल. ८ संघांमध्ये एकूण ३१ सामने खेळवले जातील. विश्वचषकाचे सामने मुल्लानपूर (मोहाली), इंदूर, रायपूर, तिरुअनंतपुरम आणि विशाखापट्टणम येथे खेळवले जातील.