ICC ODI World Cup PAK vs BAN Live : पाकिस्ताननेवन डे वर्ल्ड कप स्पर्धेत तिसऱ्या विजयाची नोंद करताना आव्हान कायम राखले. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्यांनी दणदणीत विजय मिळवून नेट रन रेटची चांगलाच सुधारला आणि याचा फायदा त्यांना उपांत्य फेरीचे गणित सोडवण्यासाठी होणार आहे. पाकिस्तान आता ६ गुणांसह पाचव्या क्रमांकावर आला आहे आणि त्यांना उर्वरित दोन लढतीत न्यूझीलंड ( ४ नोव्हेंबर) व इंग्लंड ( ११ नोव्हेंबर) यांच्याविरुद्ध खेळायचे आहे. हे दोन्ही सामने त्यांना जिंकावे लागतीलच, शिवाय अन्य संघांच्या कामगिरीवर अवलंबून रहावे लागेल. 
हद्दच झाली! मोहम्मद रिझवानने DRS घेऊ की नको, हे बांगलादेशच्या फलंदाजालाच विचारले, Video 
इमाम-उल-हकच्या जागी संधी मिळालेल्या फखर जमानने आज अब्दुल्लाह शफीकसह बांगलादेशच्या गोलंदाजांनी चांगलीच धुलाई केली. पाकिस्तानचा संघ गुणतालिकेत -०.३९ नेट रन रेटसह सातव्या क्रमांकावर होता आणि त्यांना दोन गुणांसह नेट रन रेटमध्ये चांगली सुधारणा करण्यासाठी ही मॅच लवकर जिंकावी लागणार होती. त्या निर्धारानेच जमान व शफीक यांनी फटकेबाजी केली. शफीकने ५६ चेंडूंत, तर जमानने ५१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले अन् पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारीही पूर्ण केली. २२व्या षटकात १२८ धावांची ही भागीदारी मेहिदी मिराजने तोडली. शफीक ९ चौकार व २ षटकारांसह ६८ धावांवर पायचीत झाला. 

शफीकची ही यंदाच्या वर्ल्ड कपमधील चौथी ५०+ धावांची खेळी ठरली. त्याने पाकिस्तानकडून एकाच वर्ल्ड कप स्पर्धेत ४ फिफ्टी प्लस खेळी करण्याच्या मिसबाह उल हक ( २०१५) व बाबर आजम ( २०१९) यांच्याशी बरोबरी केली. जावेद मियाँदाद यांनी १९९२ मध्ये पाचवेळा ५०+केल्या होत्या. शफीकच्या विकेटनंतरही जमानची फटकेबाजी सुरूच राहिली. कर्णधार बाबर आजम ( ९) मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात मिराजच्या गोलंदाजावीर झेलबाद झाला. जमान ७४ चेंडूंत ३ चौकार व ७ षटकारांसह ८१ धावांवर मिराजच्या गोलंदाजीवर बाद झाला. इफ्तिखार अहमद ( १७) आणि मोहम्मद रिझवान ( २६) यांनी आक्रमक फटकेबाजी करून पाकिस्तानचा विजय पक्का केला.  पाकिस्तानने ३२.३ षटकांत ३ बाद २०५ धावा करून मॅच जिंकली. 

तत्पूर्वी, पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये आज दोस्ती यारी पाहायला मिळाली. बाबर आजम, मोहम्मद रिझवान व शाहीन शाह आफ्रिदी यांच्यातल्या वादांच्या बातम्यांची आज हवा निघाली. शाहीन, मोहम्मद वसीम ज्युनियर यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या, तर हॅरीस रौफने २ विकेट्स घेतल्या. बांगलादेशसाठीही हा सामना जिंकणे महत्त्वाचे आहे आणि त्यांच्याकडून लिटन दास ( ४५), महमुदुल्लाह ( ५६) व शाकिब अल हसन ( ४३) यांनी चांगला खेळ केला. मेहिदी हसन मिराजनेही २५ धावांचे योगदान दिले. बांगलादेशचा संपूर्ण संघ ४५.१ षटकांत २०४ धावांवर तंबूत परतला.