नवी दिल्ली : गेल्या वर्षी फार अधिक सामने खेळल्यामुळे आयपीएलमध्ये (इंडियन प्रीमियर लीग) २०१९ मध्ये महत्त्वांच्या बाबीकडे लक्ष देता आले नाही. पण यावेळी या टी-२० स्पर्धेत यशाचा पूर्ण विश्वास होता, असे मत भारतीय फिरकीपटू कुलदीप यादवने व्यक्त केले.
तो म्हणाला,‘गेल्या वेळी मला योग्य रणनीती तयार करता आली नाही. त्याची मला झळ बसली.’ या चायनामन गोलंदाजाला आयपीएल २०२० मध्ये यशाची हमी होती. पण कोविड-१९ महामारीमुळे या स्पर्धेच्या आयोजनाबाबत साशंकता आहे.
कोलकाता नाईट रायडर्सच्या (केकेआर) वेबसाईटसोबत बोलताना कुलदीप म्हणाला,‘मी आयपीएल २०२० साठी पूर्णपणे सज्ज होतो. मी त्याच्यासाठी चांगली रणनीती आखली होती. मी यावेळी यशाबाबत शंभर टक्के आश्वस्त होतो.’ दरम्यान, कुलदीप म्हणाला,‘गेले सत्र माझ्यासाठी विशेष खराब नव्हते. मला विकेट मिळाल्या नसल्या तरी मी किफायती मारा केला. पण लेग स्पिनरचे यश त्याने घेतलेल्या बळींवर अवलंबून असते. मला जास्त बळी घेता आले नाही, पण माझा इकोनॉमी रेट चांगला होता. ज्यावेळी बळी घेत नाही त्यावेळी मनोधैर्य ढासळते. याव्यतिरिक्त एका सामन्यात मी अधिक धावा दिल्या होत्या. त्यामुळे माझे मनोधैर्य ढासळले होते.’
>गेल्या वर्षी सरावाची संधी नव्हती
‘ज्यावेळी मी आयपीएलमध्ये सहभागी झालो त्यावेळी फार सराव केलेला नव्हता. २०१९ च्या आयपीएल सत्रासाठी कुठली योजना न बनविणे माझ्यासाठी धडा देणारे ठरले. गेल्या वर्षी विशेषत: आंतरराष्ट्रीय पातळीवर फार अधिक क्रिकेट खेळल्या गेले. मी आयपीएल सुरू होण्याच्या केवळ तीन दिवसापूर्वी संघासोबत जुळलो. त्यामुळे योग्य पद्धतीने रणनीती तयार करता आली नाही.’