आज भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-२० विश्वचषकातील दुसरा सेमीफायनल सामना खेळला जाणार आहे. संपूर्ण जगाचे लक्ष या लढतीकडे असतानाच, भारतीय गोलंदाजांसमोर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरचे आव्हान असेल. या विश्वचषकात बटलरची बॅट आतापर्यंत शांत असली तरी, मुंबईचे वानखेडे स्टेडियम हे त्याच्यासाठी घरच्या मैदानासारखे आहे, जिथे तो सामन्याचे रुप बदलू शकतो.
जोस बटलरसाठी वानखेडे स्टेडियम नवीन नाही. आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव असलेल्या बटलरने येथे ३१ टी-२० सामन्यांत ३२.४६ च्या सरासरीने आणि १४३.८२ च्या स्ट्राईक रेटने ९०९ धावा कुटल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. जर बटलरला सुरुवातीलाच लय सापडली, तर तो एकहाती सामना भारताच्या हातून हिसकावून घेऊ शकतो.
बटलरला पॅड्सवर चेंडू दिल्यास तो सहज सीमापार धाडतो. त्यामुळे त्याला चौथ्या किंवा पाचव्या स्टंपच्या लाईनवर गोलंदाजी करणे फायदेशीर ठरेल. यामुळे त्याला ड्राईव्ह किंवा कट मारताना चूक करण्यास भाग पाडले जाऊ शकते. शिवाय, भारताने मधल्या षटकांची वाट न बघता लवकर फिरकीपटूंचा वापर करणे फायदेशीर ठरू शकतो. वरुण चक्रवर्तीची गूढ फिरकी आणि अक्षर पटेलचा अचूक मारा बटलरला चकवू शकतो. काही चेंडू निर्धाव ठरल्यास तो मोठ जोखीम घेताना बाद होण्याची शक्यता वाढते.
पॉवर प्ले ठरणार निर्णायक
बटलर हा पॉवरप्लेपासून डेथ ओव्हर्सपर्यंत कोणत्याही टप्प्यात धावा काढण्याची क्षमता ठेवतो. जर भारताने सुरुवातीच्या षटकांमध्ये त्याला शांत ठेवले, तर त्याच्यावर धावगती वाढवण्याचा दबाव येईल. अशा स्थितीत तो विकेट गमावू शकतो आणि हाच सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. वानखेडेच्या फलंदाजीला अनुकूल खेळपट्टीवर जोस बटलरला लवकरात लवकर तंबूत धाडणे, हीच भारतीय विजयाची पहिली पायरी असेल