Sanjay Manjrekar On Virat Kohli's Test Retirement Call : भारतीय संघाचा माजी क्रिकेटर संजय मांजरेकर याने विराट कोहलीच्या कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीसंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. संघर्षातून मार्ग काढून कसोटीत टिकून राहण्यापेक्षा विराट कोहलीनं या प्रकारातून निवृत्ती घेत फक्त वनडे खेळण्याचा सोपा मार्ग निवडला, असे मांजरेकरांनी म्हटलं आहे. फॅब फोर (Fab Four) मध्ये विराट कोहलीनं असा निर्णय घेणं दुर्दैवी आहे, असा उल्लेखही त्यांनी केला आहे. नेमकं ते काय म्हणाले आहेत जाणून घेऊयात त्यासंदर्भातील सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रूट, स्मिथ आणि विल्यमसन वारसा जपत असताना कोहलीनं मैदान सोडलं!
संजय मांजरेकर यांच्या मते, इंग्लंडचा जो रूट, ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ आणि न्यूझीलंडचा केन विल्यमसन हे खेळाडू सातत्याने कसोटी क्रिकेट खेळत आपला वारसा अधिक भक्कम करत आहेत. पण कोहलीनं कसोटी कारकिर्दीत संघर्षाचा सामना करत असताना निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला हे दुर्दैवी आहे, असा उल्लेख करत कोहलीनं कसोटीत खेळत राहायला हवे होते, असे मत माजी क्रिकेटरनं मांडले आहे.
AUS vs ENG 5th Ashes Test : शतकी खेळीसह स्टीव्ह स्मिथचा मोठा पराक्रम; राहुल द्रविडलाही टाकलं मागे
या गोष्टीची खंत वाटते
समालोचक आणि क्रिकेट विश्लेषकाच्या रुपात सक्रीय असलेले माजी क्रिकेटर संजय मांजरेकरांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात ते म्हणाले आहेत की, जो रूटने कसोटी क्रिकेटमध्ये नवे शिखर गाठले आहे. कसोटीतील त्याची खेळी पाहताना मला विराट कोहली आठवला. त्याने कसोटी क्रिकेट सोडलं, आणि हे दुर्दैवी आहे की, त्याच्या कसोटी कारकिर्दीच्या अखेरच्या पाच वर्षांत तो संघर्ष करत राहिला. या काळातील सरासरी फक्त ३१ का राहिली? याचं मूळ कारण शोधून उणीव भरून काढण्याचा प्रयत्नच त्याने केला नाही. आज रूट, स्मिथ आणि विल्यमसन कसोटी क्रिकेटमध्ये नाव कमावत आहेत आणि कोहली त्यात नाही, याची मला खंत वाटते.
विश्रांती घेऊन पुन्हा मेहनत घेता आली असती, पण...
मांजरेकर यांनी पुढे सांगितलं की, कोहली आपल्या तंत्रज्ञानावर आणि मानसिकतेवर काम करू शकला असता. त्यासाठी काही काळ विश्रांती घेणंही शक्य होतं. काही काळ विश्रांती घेऊन देशांतर्गत क्रिकेट किंवा परदेशात प्रथम श्रेणी क्रिकेटच्या माध्यमातून तो चांगली कामगिरी करू शकला असता. पण मेहनत घेण्याऐवजी त्याने सोपा मार्ग निवडला. कसोटी सोडून फक्त वनडे खेळण्याचा त्याचा निर्णय अधिक निराशजनक आहे. वनडे हा कसोटीपेक्षा अधिक सोपा प्रकार आहे, असे म्हणत मांजरेकरांनी कोहलीच्या कसोटीतील निवृत्तीवर मोठं वक्तव्य करून सात महिन्यापूर्वींची गोष्ट पुन्हा एकदा चर्चेत आणली आहे.