Join us
Daily Top 2Weekly Top 5

आयपीएलमधील आक्रमकतेमुळे फिरकीपटूंची जादू ओसरली?

आयपीएल २०२६च्या हंगामात हा एकमेव असा सामना राहिला आहे, ज्यामध्ये फिरकीपटूंनी आपल्या चमकदार कामगिरीने प्रतिस्पर्धी संघाला पुर्णपणे नामोहरम केले होते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 09:51 IST

Open in App

अयाज मेमनकन्सल्टिंग एडिटर

यंदाच्या आयपीएलमधील आकडेवारी एक गोष्ट स्पष्टपणे अधोरेखित करते की, या स्पर्धेत फिरकी गोलंदाजांचे महत्त्व कमी होत चालले आहे. शनिवारी झालेल्या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यापूर्वीच्या (दिल्ली विरुद्ध पंजाब) आकडेवारीवर नजर टाकल्यास, सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत रवी बिश्नोई आणि हर्ष दुबे या केवळ दोनच फिरकीपटूंचा समावेश आहे. आयपीएलचा आतापर्यंतचा इतिहास पाहिला, तर सर्वाधिक बळी घेणाऱ्या अव्वल दहा गोलंदाजांच्या यादीत तब्बल सहा फिरकीपटू आहेत. यावरून स्पष्ट होते की, आयपीएलमध्ये नेहमीच फिरकीचा दबदबा राहिला आहे. फलंदाजांचे वर्चस्व असलेल्या या स्पर्धेमुळे फिरकी गोलंदाजीची कला संपुष्टात येईल, असे अनेकांनी म्हटले होते; मात्र, याउलट अनेक फिरकीपटू मॅच विनर ठरल्याचे आपण आजवर पाहिले आहे. 

फलंदाजांच्या दृष्टिकोनात मोठा बदल : आयपीएल २०२६च्या या हंगामात अव्वल दहा गोलंदाजांमध्ये केवळ दोन फिरकीपटूंचे असणे हा निश्चितच चिंतेचा विषय आहे. याचा अर्थ फिरकी गोलंदाजांना पूर्वीइतके महत्त्व दिले जात नाहीये. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे टी-२० क्रिकेटमध्ये फलंदाजांच्या दृष्टिकोनात झालेला मोठा बदल. फलंदाज आता पहिल्याच चेंडूपासून हल्ला चढवू लागले आहेत. अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन यांसारख्या आक्रमक सलामीवीरांसमोर कोणताही कर्णधार फिरकीपटूला गोलंदाजी देण्याचा धोका पत्करण्यास धजावत नाही. परिणामी, पॉवरप्लेमध्ये फिरकीपटूंचा वापर करणे टाळले जाते. डावाच्या शेवटच्या तीन-चार षटकांत तर फलंदाजांची आक्रमकता शिगेला पोहोचलेली असते. त्यावेळी ते कोणत्याही गोलंदाजाला सोडण्याच्या मनःस्थितीत नसतात. त्यामुळे  फिरकीपटूंना दूर ठेवले जाते.

‘ऑफ-स्पिनर्स’ होत आहेत नामशेष : इम्पॅक्ट प्लेयर नियमानेही फिरकीपटूंच्या अडचणी वाढवल्या आहेत. या नियमामुळे कर्णधार कोणत्याही कसलेल्या फलंदाजाला मधल्या षटकांत खेळवू शकतो. अनेकदा या इम्पॅक्ट प्लेयरला केवळ फिरकीपटूंच्या धुलाईसाठीच पाठवले जाते. त्यामुळे फिरकीपटूंना पुन्हा  आक्रमणापासून दूर ठेवले जाते. आक्रमकतेच्या काळात ऑफ-स्पिनर्स तर जणू नामशेष होत चालले आहेत. एक काळ असा होता जेव्हा रविचंद्रन अश्विन, हरभजन सिंग, मोईन अली यांसारख्या ऑफ-स्पिनर्सचा आयपीएलमध्ये दबदबा होता.  

अकिल आणि नूरचा अपवादात्मक दबदबा :  मुंबईविरुद्धच्या सामन्यात चेन्नईच्या अकिल होसेन (वेस्ट इंडिज) आणि नूर अहमद (अफगाणिस्तान) या दोन डावखुऱ्या फिरकीपटूंनी मात्र कमाल केली. अकिल होसेनने १७ धावांत ४ बळी घेतले, तर नूर अहमदने २४ धावांत २ बळी मिळवले. मुंबईचा मोठा पराभव झाला. आयपीएल २०२६च्या हंगामात हा एकमेव असा सामना राहिला आहे, ज्यामध्ये फिरकीपटूंनी आपल्या चमकदार कामगिरीने प्रतिस्पर्धी संघाला पुर्णपणे नामोहरम केले होते. अकिल आणि नूर हे दोघेही परदेशी फिरकीपटू असूनही त्यांनी यश मिळवले, मात्र बहुतांश भारतीय फिरकीपटूंना यंदा झगडावे लागत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : IPL's Aggression: Spinners Losing Magic?

Web Summary : IPL 2024 sees spinners fading due to aggressive batting. Powerplay and impact players limit their roles. Off-spinners are disappearing, though some foreign spinners excel.
टॅग्स :आयपीएल २०२६