भारतीय संघाने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली २०२६ चा टी-२० विश्वचषक जिंकून इतिहास रचला आहे. या ऐतिहासिक विजयात अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने मोलाची भूमिका बजावली. विजयानंतर मैदानात जल्लोष करताना हार्दिकने आपल्या भावना व्यक्त केल्या असून, आगामी काळातील आपल्या मोठ्या ध्येयाचा खुलासा केला आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात हार्दिकने आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. फलंदाजी करताना त्याने अवघ्या १३ चेंडूंत १८ धावांची खेळी केली, ज्यात एक चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. त्यानंतर गोलंदाजीतही त्याने ४ षटकांत ३६ धावा देऊन मार्क चॅपेलचा महत्त्वाचा विकेट घेतला. भारताच्या विजयानंतर हार्दिकने सर्वप्रथम तिरंगा खांद्यावर घेऊन मैदानावर धाव घेतली आणि आपली मैत्रीण महिका शर्मासोबत विजयाचा आनंद साजरा केला.
विजयानंतर हार्दिकने आपल्या भविष्यातील योजनांबद्दल सांगितले. तो म्हणाला की, "माझ्याकडे अजून १० वर्षांचे क्रिकेट शिल्लक आहे, असे मला वाटते. या १० वर्षांत मला किमान १० आयसीसी ट्रॉफी जिंकायच्या आहेत. हेच माझे पुढचे मोठे ध्येय आहे." भारताने घरच्या मैदानावर टी-२० विश्वचषक जिंकणारा पहिला देश ठरण्याचा मान मिळवला आहे, याबद्दल बोलताना हार्दिक भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. तो म्हणाला की, "प्रेक्षकांचा उत्साह आणि प्रेम ही आमच्या यशाची खरी पावती आहे."
भारताची विश्वविक्रमाला गवसणी
सूर्यकुमारच्या नेतृत्वात टी-२० विश्वचषक जिंकून भारताने विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. भारताने आतापर्यंत आयसीसी टी-२० विश्वचषकाच्या एकूण तीन ट्रॉफी जिंकल्या आहेत. आतापर्यंत कोणत्याही संघाला अशी कामगिरी करता आली नाही. भारतानंतर वेस्ट इंडीज (२०१२,२०१६) आणि इंग्लंडने (२०१०, २०२२) प्रत्येकी दोन ट्रॉफी जिकल्या आहेत.