Join us  

Video: हार्दिक पांडया विजयाचा सुपरस्टार, विराट कोहलीने दिली कौतुकाची थाप

रविवारी झालेल्या तिसऱ्या वनडेत विराट कोहलीच्या भारतीय संघाने 47.5 षटकांत ऑस्ट्रेलियावर 5 गडी राखून सहज विजय मिळवला. चेन्नई, कोलकाता आणि इंदूर असे तिन वन-डे सामने जिंकत भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका 3-0 अशी खिशात घातली. 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2017 2:37 PM

Open in App

इंदोर - रविवारी झालेल्या तिसऱ्या वनडेत विराट कोहलीच्या भारतीय संघाने 47.5 षटकांत ऑस्ट्रेलियावर 5 गडी राखून सहज विजय मिळवला. चेन्नई, कोलकाता आणि इंदूर असे तिन वन-डे सामने जिंकत भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका 3-0 अशी खिशात घातली. 

ऑस्ट्रेलियाविरोधातील तिस-या एकदिवसीय सामन्यात हार्दिक पांड्याने होळकर स्टेडियमवर मोक्याच्या क्षणी 78 धावांची खेळी करत भारताला विजयाच्या उंबरठ्यावर नेलं. संघाला विजय मिळवून देण्यात हार्दिक पांड्याने महत्वाची भूमिका बजावली. यासाठी त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला.

प्रमोशन देत चौथ्या क्रमांकावर पाठवण्यात आल्यानंतर हार्दिक पांड्याने 72 चेंडूंमध्ये 78 धावा केल्या. फक्त फलंदाजीच नाही तर गोलंदाजीतही हार्दिक पांड्या चमकला. दोन विकेट्स मिळवण्यात तो यशस्वी झाला. कर्णधार विराट कोहली पांड्याच्या प्रदर्शनावर भलताच खुष आहे. रविवारी सामना संपल्यावर त्याने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत कोहली पांड्याचं स्वागत मॅन ऑफ द मॅच...मॅन ऑफ द मोमेंट म्हणून करतो. पांड्याने अखेरच्या दोन्ही सामन्यांमध्ये शानदार प्रदर्शन केलं, भारताच्या विजयात त्याने मोलाची भूमिका निभावली. तो विजयाचा सुपरस्टार आहे असं कोहली म्हणाला. कोहलीने इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर शेअर केलेला हा व्हिडीओ पांड्याने आपल्या अकाउंटवरूनही शेअर केला आहे.  

हार्दिक पांड्याला महेंद्रसिंग धोनीच्या आधी फलंदाजीला पाठवण्याबाबत जेव्हा विराट कोहलीला विचारण्यात आलं तेव्हा त्याने सांगितलं की, 'प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी तो निर्णय घेतला होता. त्यांचं म्हणणं होतं की, ऑस्ट्रेलियावर मात करायची असेल तर आपल्याला स्पिनर्सवर हल्ला करण्याची गरज आहे'. पुढे बोलताना विराट कोहलीने सांगितलं की, 'हार्दिक पांड्या भारतासाठी एक एक मौल्यवान खेळाडू आहे. तो कधीच स्वत:वर अविश्वास दाखवत नाही. त्याला स्वत:वर आत्मविश्वास असून आव्हान द्यायला आवडतं'.  

मॅन ऑफ द मॅच हार्दिक पांड्याने सामन्यानंतर प्रतिक्रिया देताना सांगितलं की, 'मला खूप चांगलं वाटतंय, पण सामना संपवू शकलो नाही याचं दुख: आहे. मला चौथ्या क्रमांकावर पाठवण्यात आलं, मी याकडे एक संधी म्हणून पाहिलं. एश्टनविरोधात आक्रमक खेळी करायचं मी ठरवलं होतं. जेव्हा मी षटकार मारला तेव्हा मला आत्मविश्वास मिळाला. मला संघात आपलं योगदान देण्यास आवडेल. मला अजून सुधार करायचा आहे'.

रोहित शर्मा (७१) व अजिंक्य रहाणे (७०) या मुंबईकर सलामीवीरांच्या आक्रमकतेनंतर हार्दिक पांड्याच्या (७८) तडाखेबंद फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने सलग तिस-या सामन्यात बलाढ्य आॅस्ट्रेलियाला ५ विकेट्सने लोळवून पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली. आॅस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना अ‍ॅरोन फिंचच्या शतकाच्या जोरावर ६ बाद २९३ धावा उभारल्या. भारताने हे लक्ष्य ५ फलंदाजांच्या मोबदल्यात सहज पार केले. निर्णायक अष्टपैलू कामगिरी केलेल्या हार्दिक पांड्याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

 

टॅग्स :विराट कोहलीक्रिकेटभारतीय क्रिकेट संघ