नवी दिल्ली : पूर्णपणे तंदुरुस्त झालेला स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्याने डीवाय पाटील टी२० चषक स्पर्धेत शुक्रवारी बीपीसीएलविरुद्ध केवळ ५५ चेंडूंमध्ये नाबाद १५८ धावांचा तडाखा दिला. त्याने तब्बल २० षटकारांचा पाऊस पाडताना सहा खणखणीत चौकार मारत आपली खेळी सजवली.
पाठीवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या पांड्याने झंझावाती खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर रिलायन्स वनने निर्धारित २० षटकांत ४ बाद २३८ धावांची मजल मारली. हार्दिकने याआधी मंगळवारी केवळ ३९ चेंडूंत १०५ धावा केल्या होत्या. त्याने बीपीसीएलविरुद्ध षटकारांचा पाऊस पाडताना संदीप शर्मा, सिल्वेस्टर डिसूजा, अष्टपैलू शिवम दुबे, परिक्षित वालसांगकर, सागर उदेशी व राहुल त्रिपाठी यांची धुलाई केली. यासह आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी हार्दिकचे राष्ट्रीय संघातील पुनरागमन निश्चित मानले जात आहे. हार्दिकच्याच संघातून खेळत असलेला स्टार सलामीवीर शिखर धवन केवळ ३ धावा काढून बाद झाला.
>गोलंदाजीतही छाप
मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना बीपीसीएल संघ केवळ १३४ धावात गारद झाला. रिलायन्स वन संघाने या लढतीत १०४ धावांनी दणदणीत विजय नोंदवला. हार्दिकने गोलंदाजीत एका षटकात सहा धावांच्या मोबदल्यात एक बळीही घेतला. त्याचवेळी अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारलाही एक बळी मिळवण्यात यश आले.