Harbhajan Singh slams Pakistan, IND vs PAK Asia Cup 2025: आशिया चषक २०२५ मध्ये भारतीय संघाने पाकिस्तानला गट फेरीपाठोपाठ सुपर-४ फेरीतही पराभवाची धूळ चारली. रविवारी रंगलेल्या सुपर-४ च्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर ६ गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने फरहानच्या ५८ धावांच्या जोरावर १७१ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना, भारतीय संघाने सहज विजय मिळवला. भारताच्या डावाच्या वेळी, पाकिस्तानी खेळाडू मुद्दामून भारतीय फलंदाजांशी बाचाबाची, वाद घालण्याचा प्रयत्न करत होते. पण भारतीय खेळाडूंनी आपल्या खेळाने त्यांना उत्तर दिले. या घटनेनंतर भारतीय माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग याने पाकिस्तानला सुनावले.
हरभजन म्हणाला...
हरभजन सिंगने सोशल मीडियावर पाकिस्तानी संघाची खिल्ली उडवली आणि भारत-पाकिस्तान स्पर्धा एकतर्फी असल्याचे म्हटले. भज्जीने भारताच्या सहा विकेटने विजयाचा उल्लेख करत म्हटले की, आता, रविवारी नाही तर पुढच्या वर्षीच भेटूया. तोपर्यंत पाकिस्तानी संघ सराव करून अधिक चांगला खेळ अशी आशा आहे.
भज्जी एवढ्यावरच थांबला नाही. एका मुलाखतीत बोलताना तो म्हणाला की, पुढल्या सामन्यापर्यंत पाकिस्तानची ही चिल्लर पार्टी कदाचित थोडी मोठी आणि मॅच्युअर होतील. त्यांच्यात सध्या भारताशी दोन करण्यासाठी फारच कमी ताकद आहे. आणि भारतीय खेळाडू तुमची बडबड ऐकून घेणार नाहीत. तुम्ही एक शिवी दिलीत तर आमचे लोक दोन शिव्या देतील."
इरफान पठाणही पाकिस्तानवर संतापला...
"भारत - पाकिस्तानचा सामना झाला. त्यात भारताने खूपच सहज विजय मिळवला. आपण कसे जिंकलो हे कुणालाही सांगायची गरजच नाही. आपला खेळच सारंकाही बोलून गेला. भारतीय संघ जिंकतो आणि पुढे जात राहतो ही टीम इंडियाची कमाल आहे. पण सामन्याच्या वेळी पाकिस्तानी खेळाडूंकडून खूपच आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला. खूप बाचाबाची झाल्याचे दिसले. अभिषेक शर्माही म्हणाला की पाकिस्तानी खेळाडू अशी बडबड करत होते, जे त्यांना बोलायला नको होतं. म्हणूनच भारताने स्पष्ट संदेश दिला की, तुम्ही जेवढी बडबड कराल, तेवढे आम्ही विजयी होऊ आणि पुढे जात राहू," असे इरफान पठाणने पाकिस्तानला सुनावले.