Gautam Gambhir On RCB Victory Parade Stampede : आयपीएल स्पर्धेतील पहिल्या जेतेपदानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या विजयी मिरवणुकीच्या दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीच्या प्रकरणात माजी क्रिकेटर आणि भारतीय संघाचा विद्यमान प्रशिक्षक गौतम गंभीर याने एकदम रोखठोक मत मांडले आहे. जे घडलं त्यात आपली एक मोठी चूक आहे. यापुढे जबाबदारीचं भान जपायला हवे म्हणत रोड शोसंदर्भातील आपले रोखठोक मत मांडले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जे घडलं ते दु:खद
इंग्लंड दौऱ्याआधी भारतीय कसोटी संघाचा नवा कर्णधार आणि संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर या जोडीनं संयुक्तरित्या पत्रकार परिषद घेतली. यावेळी गौतम गंभीर याने RCB च्या विजयी सेलिब्रेशनवेळी बंगळुरुमध्ये घडलेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेवर भाष्य केले. खेळाच्या मैदानातील विजयाचे सेलिब्रेशन मैदानाबाहेर करण्याची गोष्ट ही पटण्याजोगी नाही. जे घडलं ते खूप दु:खद असून अशी घटना पुन्हा होणार नाही, याची खबरदारी घ्यायला हवी, असे गंभीर म्हणाला आहे.
बंगळुरुच्या चेंगराचेंगरीच्या घटनेवर काय म्हणाला गंभीर?
बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडमवरील घटनेसंदर्भात गौतम गंभीर म्हणाला की, "रोड शो करावा याची गरज मला कधीच वाटली नाही. मी ज्यावेळी खेळायचो त्यावेळीही माझे मत हेच होते. यापुढेही मी याच गोष्टीवर भर देईन. लोकांचा जीव महत्त्वाचा आहे. भविष्यात आपल्याला आणखी जागरूक होण्याची गरज आहे. जर सेलिब्रेशन करायचे असेल तर ते इंडोअर किंवा स्टेडियममध्ये करायला पाहिजे. जे घडलं ते खूप दु:खद आहे. जबाबदारी घेऊन भविष्यात ही चूक होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
स्वागतासाठी तुफान गर्दी जमली अन् चेंगराचेंगरीमध्ये ११ चाहत्यांनी गमावला जीव
आयपीएलच्या १८ व्या हंगामाच्या फायनलमध्ये आरसीबीच्या संघाने पंजाब किंग्जला पराभूत करत पहिल्यांदाच ट्रॉफी जिंकली. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळाडूंचा सत्कार सोहळा ठेवण्यात आला. चॅम्पियन्सची झलक पाहण्यासाठी RCB चाहत्यांनी मोठी गर्दी केली. दरम्यान चेंगराचेंगरीची दुर्देवी घटना घडली अन् यात ११ चाहत्यांनी आपला जीव गमावला. ३० हून अधिक चाहते जखमीही झाले आहेत.
"