Rishabh Pant KL Rahul, IND vs ENG: भारतीय संघाने इंग्लंड दौऱ्याची सुरुवात चांगली केली. इंग्लंड आणि भारत यांच्यातील पहिला कसोटी सामना लीड्समध्ये खेळला जात आहे. भारताने पहिल्या डावात यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल आणि ऋषभ पंत यांच्या शतकांच्या जोरावर ४५०पार मजल मारली. त्यानंतर दुसऱ्या डावातही भारताने दमदार फलंदाजी केली. दुसऱ्या डावात राहुल-पंत या दोघांनी शतके झळकावली. राहुलने १३७ धावा केल्या तर ऋषभ पंतने ११८ धावा कुटल्या. असे असताना चौथ्या दिवसाचा खेळ सुरु असताना समालोचन करणाऱ्या इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याने केएल राहुल आणि ऋषभ पंत यांच्यावर एक आरोप केला आहे.
स्टुअर्ट ब्रॉड काय म्हणाला?
समालोचन करताना स्टुअर्ट ब्रॉड म्हणाला की, इंग्लंडचे गोलंदाज खूपच त्रासले आणि रागावले असतील. कारण दोन्ही खेळाडू प्रत्येक चेंडूनंतर सतत बराच वेळ घेत होते. तुम्ही पंचांना आठवण करून दिली पाहिजे की तुमचा संघ पूर्णपणे तयार आहे आणि फलंदाजांनी जास्त वेळ घेऊ नये. मी स्वतः फलंदाजांना सांगितले असते की मी माझ्या गोलंदाजीच्या रनअपकडे जाईन, तेव्हा तुम्ही तयार राहावे. राहुल फिल्डिंगकडे बघत बसायचा आणि कार्सला गोलंदाजीला धावत येण्यासाठी १० सेकंद जास्त लागायची. या गोष्टीकडे पंचांनी गांभीर्याने पाहिले पाहिजे.
स्टुअर्ट ब्रॉडसोबत समालोचन करणारी मेल जोन्सही म्हणाली की, हे बरोबर नाही. आम्ही क्रिकेट पाहत मोठे झालो आहोत आणि जेव्हा गोलंदाज गोलंदाजी करण्यास तयार असेल तेव्हा तुम्ही तयार असले पाहिजे. दुसरे म्हणजे, भारतीयांना खेळावर नियंत्रण मिळवायचे असेल म्हणून ते खेळ थांबवायच्या ऐवजी संथ करत आहेत आणि हा भारतीय संघाच्या खेळाचा एक भाग असेल. इंग्लंडच्या गोलंदाजांनी याकडे लक्ष द्यायला हवे.
दरम्यान, या सामन्यात टीम इंडियाने पहिल्या डावात ४७१ धावा केल्या, ज्याला प्रत्युत्तर म्हणून इंग्लंडचा संघ ४६५ धावांवर ऑलआउट झाला. टीम इंडियाने दुसऱ्या डावात ३६४ धावा केल्या. या दोन खेळाडूंव्यतिरिक्त भारतीय संघाकडून करुण नायरने २०, साई सुदर्शनने ३० तर रवींद्र जाडेजाने २५ धावा केल्या. यजमान संघाकडून दुसऱ्या डावात जोश टंग आणि ब्रायडन कार्सेने प्रत्येकी तीन बळी घेतले.