Join us  

India vs Pakistan मालिका सोडा... चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आम्ही पाकिस्तानात नाही जाणार! 

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) याने काही दिवसांपूर्वी India vs Pakistan द्विदेशीय मालिकेवर आपले स्पष्ट मत मांडले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 4:04 PM

Open in App

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) याने काही दिवसांपूर्वी India vs Pakistan द्विदेशीय मालिकेवर आपले स्पष्ट मत मांडले होते. पाकिस्तान हा चांगला संघ आहे आणि परदेशात त्यांच्याविरुद्ध द्विदेशीय कसोटी मालिका खेळवण्याला, रोहितने पसंती व्यक्त केली होती. पण, BCCI ने रोहितच्या या इच्छेवर पाणी फिरवले, शिवाय चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी पाकिस्तानमध्ये खेळायला न जाणार असल्याची भूमिकाही स्पष्ट केली. 

चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानला मिळालं आहे. १९९६च्या वर्ल्ड कपनंतर पाकिस्तानमध्ये बऱ्याच वर्षांची आयसीसीची स्पर्धा होणार आहे. पण, टीम इंडियाच्या सहभागावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे.  दोन्ही देशांतील राजकीय परिस्थिती पाहता द्विदेशीय मालिकाही बंद झाल्या आहेत. त्यात नुकतेच आशिया चषक २०२३च्या यजमानपदावरून नाट्य रंगले होते. आता तसेच नाट्य चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी रंगताना दिसणार आहे. 

IANS ने दिलेल्या वृत्तानुसार भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतात जाणार नाही. एकतर स्पर्धेचे ठिकाण बदला किंवा आशिया चषक २०२३ प्रमाणे ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलनुसार खेळवा, ज्यानुसार भारताचे सामने दुसऱ्या देशात खेळवावे, अशी मागणी होत आहे. ''द्विदेशीय मालिका सोडा... भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाणार नाही. स्पर्धेचे ठिकाण बदलले जाऊ शकते किंवा हायब्रिड मॉडेलनुसार ती खेळवली जाऊ शकते,'' असे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर IANS ला सांगितले. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारच्या मान्यतेवर सर्व अवलंबून आहे. सध्याच्या राजकीय वातावरणामुळे, भारत सरकार संघाला पाकिस्तानला जाण्याची परवानगी देईल की नाही हे स्पष्ट नाही. आयसीसी स्पर्धेत न खेळणे हा भारतासाठी कठीण निर्णय असेल, परंतु कोणत्याही प्रवासासाठी सरकारची परवानगी आवश्यक असेल. भारत आणि पाकिस्तान यांच्यात लवकरच द्विपक्षीय मालिका होण्याची शक्यता नाही.सूत्रांने सांगितले की, "बीसीसीआयला प्रवासासाठी सरकारची परवानगी लागेल, सध्या आमचे पाकिस्तानसोबतचे संबंधही चांगले नाहीत. चॅम्पियन्स ट्रॉफी ही आयसीसीची स्पर्धा आहे, त्यामुळे भारतासाठी हा एक कठीण कॉल असेल पण सरकारच्या ग्रीन सिग्नलशिवाय काहीही नाही. द्विपक्षीय मालिका, मला नजीकच्या भविष्यात दिसत नाही, ते अशक्य आहे.''  

टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तानरोहित शर्माबीसीसीआय