First time in IPL 2025 PBKS vs KKR: पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना अतिशय रोमांचक झाला. १५ एप्रिल रोजी झालेल्या या सामन्यात कोलकाताने विजयाच्या समीप असलेला सामना गमावला आणि त्यांना १६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने प्रभसिमरन सिंगच्या (३०) खेळीच्या जोरावर १११ धावांचा पल्ला गाठला. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताची सुरुवात उत्तम झाली, पण नंतर चहलने २८ धावांत ४ बळी घेत कोलकाताचा डाव ९५ धावांवर संपुष्टात आणला. KKRला पराभवाचे दु:ख असतानाच, त्यांच्यावर चिटींगचा आरोप केला जात आहे.
नेमकं काय घडलं?
सामन्यादरम्यान दोन खेळाडू गेज चाचणीत नापास झाले, म्हणजेच त्यांची बॅट कायद्याच्या चौकटीत बसत नव्हती. लाईव्ह सामन्यादरम्यान, सुनील नरेन आणि एनरिक नॉर्खिया यांच्या बॅटची रुंदी नियमांनुसार नव्हती. या हंगामात एखाद्या खेळाडूची बॅट बेकायदेशीर घोषित करण्याची ही पहिलीच घटना ठरली. कोलकाताकडून सुनील नारिन खेळायला आला तेव्हा राखीव पंच सय्यद खालिद यांनी सुनील नारिनची बॅट तपासली. बॅटचा सर्वात जाड भाग गेजमधून पास होत नव्हता, त्यामुळे नारिनला बॅट बदलावी लागली. यानंतर १६ व्या षटकात एनरिक नॉर्खिया आला तेव्हाही तसेच घडले. पंच मोहित कृष्णदास आणि साइदर्शन कुमार यांनी बॅटची चाचणी केली. त्यात तो नापास झाला आणि त्यालाही बॅट बदलावी लागली.
बॅटचा नियम काय?
पूर्वी ड्रेसिंग रूममध्ये बॅट्सची तपासणी केली जात होती, परंतु गेल्या काही सामन्यांमध्ये मैदानावरच तपासणी केल्याचे दिसून आले. जर आपण नियमांबद्दल बोललो तर, बॅटच्या पुढच्या भागाची रुंदी १०.७९ सेमी पेक्षा जास्त नसावी, तर त्याच्या ब्लेडची जाडी ६.७ सेमी पेक्षा जास्त नसावी. याशिवाय, बॅटच्या काठाची रुंदी ४ सेमीपेक्षा जास्त आणि लांबी ९६.४ सेमीपेक्षा जास्त नसावी.